उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनांच्या लाभार्थीसाठी पूर्वी तहसील कार्यालयामार्फत लाभार्थीची यादी बँकेला पाठवून त्यानुसार बँकेमार्फत हा निधी लाभार्थीच्या खात्यामध्ये जमा केला जात होता.यामुळे नेहमीच या प्रक्रियेला खूप उशीर व्हायचा.योजनेचे लाभार्थी बँकेच्या चकरा मारत असायचे. परंतु ३० मे नंतर आता या लाभार्थीचे अनुदान सरळ डीबीटीमार्फत म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजनेंतर्गत थेट लाभ मिळणार आहे.संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना लाभार्थीनी हयात किंवा जिवंत प्रमाणपत्र, आधारकार्ड, बँकेचे पासबुक,आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक हे सर्व कागदपत्रे जमा केल्यानंतरच लाभार्थीना अनुदान देण्यात येणार आहे.सदर कागदपत्रे तहसील कार्यालयात,तलाठी/कोतवाल,सेतू केंद्र,महा ई-सेवा केंद्र,ग्रामपंचायत संग्राम केंद्र,स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे जमा करता येतील; अशी माहिती प्राप्त झाली आहे.यामुळे लाभार्थ्यांनी दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
डीबीटी म्हणजे (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर)अंतर्गत लाभहस्तांतरणाचे प्राथमिक उद्दिष्ट केंद्र सरकारने प्रायोजित केले आहे.निधीच्या वितरणात पारदर्शकता आणणे,चोरी व बोगस लाभार्थीची यादी संपविणे, हा डीबीटीचा उद्देश आहे.देशभर संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना आता थेट लाभ हस्तांतरण योजनेंतर्गत लाभार्थीच्या बँक खात्यात जमा होणार आहे.त्यामुळे शासनाने तात्काळ कागदपत्रे सादर करण्यासंदर्भात या योजनेच्या सर्व लाभार्थीना जवळचे तलाठी किंवा कोतवाल यांच्याकडे कागदपत्र जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.यामुळे आता बोगस लाभार्थ्यांचे खाते बंद करण्यात येणार आहे.

