- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२ ते ४ या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.तसेच पुरेसे पाणी पिणे,हलके कपडे वापरणे आणि उन्हापासून संरक्षण करण्यासाठी छत्री किंवा टोपीचा वापर करणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.अश्यातच मोलमजुरी करणारे तसेच शेतकरी बांधव उन्हातान्हात भर दुपारी कामे करण्यास मागे-पुढे पाहत नाही.मात्र,सध्या उन्हाचा तडाखा पाहता जीवाची काळजी घेणे आवश्यक आहे.राज्यात वाढत्या तापमानाचा परिणाम आता जीवघेणा ठरू लागल्याची घटना उघडकीस आली आहे.अहिल्यानगर जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.शेतात काम करत असतांनाच एका शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हर्षदा रावसाहेब चौधरी वय ४५ वर्षे, रा.ढवळपुरी, ता.पारनेर,जि.अहिल्यानगर असे मृतक शेतकरी महिलेचे नाव असून त्या दुपारच्या सुमारास शेतातील मका कापत असतांनाच मृत पावल्या.
हर्षदा चौधरी ह्या दुपारच्या सुमारास शेतावर गेल्या होत्या.शेतातील मक्याचे पीक कापणीला आल्याने त्या भर दुपारीच मका कापत असतांनाच अचानक त्यांना भोवळ आली.प्रखर उन्हामुळे त्यांना त्रास जाणवू लागला आणि त्या शेतातच बेशुद्ध पडल्या.सदरची बाब लक्षात येताच त्यांच्या पतीने तातडीने त्यांना ढवळपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र,डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.यानंतर पुढील वैद्यकीय तपासणीसाठी त्यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.शवविच्छेदनानंतर उष्माघातामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील हा यंदाच्या हंगामातील पहिला उष्माघाताचा मृत्यू ठरला आहे.राज्यातील इतर भागांतही उष्णतेचा तडाखा वाढत चालला आहे.वर्धा जिल्ह्यात उष्माघातामुळे दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटना याआधी समोर आल्या आहेत.तसेच अकोला शहरात एका मालवाहू वाहनात आढळलेल्या अनोळखी व्यक्तीच्या मृत्यूमागेही उष्माघाताचे कारण असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

आज वर्धा जिल्ह्याला उष्णलाटेचा इशारा देण्यात आला असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.मागील एका आठवड्यापासून वर्धेचे तापमान ४४ ते ४५ अंशच्या घरात आहे.वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत.एप्रिल महिण्यातच जिल्ह्याच्या तापमानाने उच्चांक गाठले आहे.वाढते तापमान पाहता नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
- Advertisement -

