- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नात्यांमधील वाढता दुरावा आणि संताप किती टोकाला जाऊ शकतो,याचे भीषण उदाहरण मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्याच्या रुई गावात आज,गुरुवार ९ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आले आहे.आईच्या निधनानंतर वडिलाने दुसरे लग्न करू नये म्हणून चक्क १९ वर्षीय पोटच्या मुलाने जन्मदात्या वडिलाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना पोलीस तपासात समोर आली आहे.विशेष म्हणजे, वडिलाचा आज विवाह होणार होता आणि विवाहाच्या दिवशीच त्यांची हत्या करण्यात आली.दिलीप धुराजी राजगुरू वय ४५ वर्षे,रा.रुई,ता.अंबड,जि.जालना असे मृतक वडिलाचे नाव आहे,तर मुलगा विलास(विशाल) दिलीप राजगुरू वय १९ वर्षे व त्याचा १७ वर्षीय सहकारी मित्र अशी आरोपींची नावे आहेत.
अंबड तालुक्यातील रुई गावात आज सकाळच्या सुमारास दिलीप राजगुरू यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घराजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आला.सदरची बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ तीर्थपुरी पोलीस ठाण्याला माहिती दिली.माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करत तपासाला सुरुवात केली. प्राथमिक तपासात दिलीप राजगुरू यांच्या डोक्यावर आणि शरीरावर कुऱ्हाडीचे गंभीर घाव असल्याचे आढळून आले,त्यामुळे ही हत्या असल्याचे स्पष्ट झाले.या प्रकरणाचा पोलिसांनी सखोल तपास सुरू केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली.दिलीप राजगुरू यांचा मुलगा विलास राजगुरू यानेच आपल्या एका साथीदाराच्या मदतीने हत्या केल्याचे उघड झाले. पोलिसांनी संशयाच्या आधारे विलासला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.या हत्येमागील कारण ऐकून सर्वांनाच धक्का बसला. विलासच्या आईचे म्हणजेच दिलीप राजगुरू यांच्या पत्नीचे एक वर्षापूर्वी निधन झाले होते.त्यानंतर,ते एकटेच राहत होते. दरम्यान,त्यांनी दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.वडिलांच्या या निर्णयाबद्दल मुलगा विलास नाराज होता.वडील दुसरे लग्न करत असल्याचा राग त्याच्या मनात खोलवर घर करून बसला होता.विलासने राग मनात धरून आपल्या एका मित्राच्या मदतीने वडिलांच्या हत्येचा कट रचला.आज सकाळच्या सुमारास संधी साधून विलासने वडिलांवर कुऱ्हाडीने सपासप वार केले,यावेळी त्यांचा जागीच मृत्यू झाला.विशेष म्हणजे, ज्या दिवशी दिलीप राजगुरू यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार होती,त्याच दिवशी त्यांचा दुर्दैवी अंत झाल्याने रुई गावासह संपूर्ण जालना जिल्हा हादरला आहे.प्रकरणाचा पुढील तपास तीर्थपुरी पोलीस ठाण्याच्या एपीआय वैशाली पवार करीत आहेत.
- Advertisement -

