- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-शतकानुशतके धार्मिक व्यवस्थेच्या गुलामगिरीत जखडलेल्या शोषित,पीडितांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी समता आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या बौद्ध धम्माची दीक्षा देऊन नवी क्रांती घडविली.त्या ऐतिहासिक घटनेला उजाळा देण्यासाठी महामानवाने मनामनात चेतवलेली समतेची मशाल हाती घेत देश-विदेशातील लाखोंचा जनसागर काल शनिवारी दीक्षाभूमीवर अवतरला. ‘जय भीम’ हा क्रांतीचा नारा देत भीमसैनिक तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक झाले.
हातात पंचशील ध्वज,पांढरा पोशाख,उरात भरलेला प्रचंड आत्मविश्वास घेऊन देशाच्या कानाकोपऱ्यातील खेड्यापाड्यांमधून लाखो अनुयायी दोन दिवसांपासून महामानवाला अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमीवर पोहोचत आहेत.त्यामुळे हा संपूर्ण परिसर भीमसैनिकांच्या गर्दीने फुलून गेला आहे.
सकाळी धम्म ध्वजारोहणासह समता सैनिक दलाच्या सैनिकांनी दीक्षाभूमी परिसरात पथसंचलन व तथागत बुद्ध व डॉ.बाबासाहेबांना मानवंदना दिली.
त्यानंतर दीक्षाभूमी स्मारक नागार्जुन सुरई ससाई यांच्या नेतृत्वात भिक्खू संघाच्या उपस्थितीत बुद्धवंदना तसेच महापरित्राण पाठ करण्यात आले.
सोबत २२ प्रतिज्ञांचे पठण करण्यात आले.तसेच देशभरातून आलेल्या इच्छुक नागरिकांनी भिक्खू संघाकडून बौद्ध धम्माची दीक्षा ग्रहण केली.दिवसभर लाखो अनुयायांनी मुख्य स्मारकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेत अभिवादन केले.धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा देश-विदेशातील भिक्खू संघांच्या उपस्थितीत पार पडला.
यंदा प्रथमच मंचावर कुठल्याही राजकीय नेत्याला स्थान दिले नाही.
- Advertisement -

