- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-विद्यार्थ्यांचे सुरक्षेबाबत विविध उपाययोजना करण्यासंबंधी महाराष्ट्र शासनाच्या २१ ऑगस्ट व २७ सप्टेंबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी त्यांचे अधिनस्त सर्व विभागप्रमुख,गटविकास अधिकारी,सहाय्यक गट विकास अधिकारी,गटशिक्षणाधिकारी,बालविकास प्रकल्प अधिकारी व इतर पर्यवेक्षकीय अधिकारी अशा तब्बल पन्नास अधिकाऱ्यांच्या पथकाद्वारे विविध खाजगी व शासकीय शाळांना भेट देऊन शासन निर्देशानुसार विद्यार्थी व विद्यार्थीनी यांचे सुरक्षेबाबत विविध बाबींचे अनुषंगाने उपाययोजना करण्यात आले किंवा नाही याबाबत तपासणी केली.
सदर तपासणीमध्ये शाळांमध्ये लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यासंबंधाने शाळांनी केलेले नियोजन,शाळांतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी,शाळेत ठेवण्यात आलेली तक्रार पेटी दर आठवडयात उघडण्यासंबंधाने केलेली कार्यवाही व नोंदी,शालेय शिक्षण विभागाचे शासन निर्णय दिनांक- ४ ऑक्टोंबर २०१६ नुसार राष्ट्रीय बालअधिकार आयोगाचे संकेतस्थळ व पोक्सो ई-बॉक्स बाबतची माहिती शाळांचे नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करणे,सखी सावित्री समिती स्थापन करणे व समितीच्या घेतलेल्या बैठका,यासंबंधाने सविस्तर पाहणी करण्यात आली. सदर तपासणी अहवालानुसार निदर्शनास आलेल्या त्रुटींचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडून पुनश्च सविस्तर आढावा घेऊन त्यावर उपाययोजना करण्यात येणार आहे.
जिल्ह्यांतर्गत खाजगी व्यवस्थापनाच्या,जिल्हा परिषदांच्या शाळांचे संस्थाचालक,मुख्यध्यापक व इतर पर्यवेक्षकीय यंत्रणा यांनी शासन निर्णयातील तरतुदीचे काटेकोरपणे पालन करावे; तसेच यामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुट्या आढळुन येणार नाही; याची दक्षता घेण्याचे सक्त निर्देश दिलेले आहे.भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटना घडणार नाही याबाबत सर्वांनी दक्ष राहावे तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी यांचे सुरक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचे निष्काळजीपणा स्विकारार्य राहणार नाही,विद्यार्थी सुरक्षेबाबत वेळोवेळी शाळांची फेरतपासणी करण्यात येणार असुन भविष्यात विद्यार्थी सुरक्षेबाबत त्रुटी आढळल्यास सक्त कार्यवाही करण्यात येईल,त्यामुळे विद्यार्थी सुरक्षेस प्रथम प्राधान्य देऊन शाळा व्यवस्थापनाने प्रभावी अंमलबजावणी करावी तसेच स्थानिक प्रशासकीय यंत्रणा,पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व पालक यांनी विद्यार्थी सुरक्षेबाबत करावयाचे उपाययोजनेमध्ये शाळा व्यवस्थापनास सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी केले आहे.
- Advertisement -

