उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-शासन स्तरावरून विकासाच्या नावावर मोठा गाजावाजा केला जात असला तरी आजही गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासीबहुल,नक्षलग्रस्त भागातील लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.आपण ७५ वा अमृत महोत्सव साजरा जरी करीत असलो; तरीही दुर्गम भागातील आदिवासी बांधव अजूनही २५ वर्षे मागे असल्याचे जाणवत आहे.असाच प्रकार गडचिरोली जिल्ह्याच्या
कोरची तालुक्यात उघडकीस आला आहे.एका गरोदर मातेला ३ ऑगस्ट रोजी चरवीदंड येथून खाटेची कावड करून पूर आणि जंगलातील पायवाटेने दोन किलोमीटरपर्यंतच्या लेकुरबोडी गावापर्यंत न्यावे लागले.गर्भवती महिला कशीबशी जिल्हा रुग्णालयात पोहोचली; मात्र,प्रसूती झाल्यानंतर बाळ दगावले असल्याने यांस जबाबदार कोण?असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरची तालुका मुख्यालयापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या चरवीदंड येथील रोशनी श्यामराव कमरो या २३ वर्षीय महिलेला शनिवार,३ ऑगस्ट रोजी प्रसूतीकळा सुरू झाल्या; परंतु चरवीदंड ते लेकुरबोडी गावादरम्यानच्या नाल्याला पूर आला होता.
या पुरातून मार्ग काढण्यासाठी रोशनीच्या कुटुंबीयांनी गावकऱ्यांच्या मदतीने खाटेची कावड बनवून तिला लेकुरबोडीपर्यंत नेले.तेथून खासगी वाहनाने कोरचीला जाऊन सकाळी ७ वाजता तिला ग्रामीण रुग्णालयात भरती केले.मात्र,डॉक्टरांनी तिला गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यास संदर्भित केले. अडचणींचा हा प्रवास येथेच थांबला नाही.तर रुग्णवाहिकेने तिला गडचिरोलीला नेत असताना बेळगाव-पुराडादरम्यान असलेल्या घाटमाथ्यावरच्या रस्त्यावरच बिघाड झालेले दोन ट्रक उभे होते.रस्ता जाम आणि दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांब रांगा होत्या.
बेळगाव-पुराडा घाटादरम्यान ट्रकच्या रांगा लागल्या असताना रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी वेळीच सतर्कता बाळगून २५ किलोमीटर अंतरावरील कुरखेडा येथून १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका बोलावली.काही वेळाने रुग्णवाहिका आली.दोन रुग्णवाहिका दोन टोकावर होत्या,तेव्हा ती गरोदर महिला अर्धा किलोमीटरची पायपीट करीत रुग्णवाहिकेपर्यंत गेली.त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या दिशेने रुग्णवाहिका रवाना झाली; परंतु प्रयत्न अपयशी ठरले.कठीण प्रवास करत महिला जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचली; पण प्रसूती होताच काही तासांतच बाळ दगावले.
चरवीदंडपासून दोन किलोमीटर अंतरावरील लेकुरबोडी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असून तेथे डॉ.राहुल कापगते आणि आरोग्य सेविका माधुरी कामडी आहेत.तसेच ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या नवेझरी येथे मानसेवी डॉक्टर डॉ.ज्ञानदीप नखाते,डॉ.नेहा मेश्राम,आरोग्य सेविका संगीता गडवाल कार्यरत आहेत; परंतु हे डॉक्टर मुख्यालयी राहत नाही, असा नागरिकांचा आरोप आहे.

