उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-सध्याचे युग हे स्पर्धेचे तसेच तंत्रज्ञानाचे युग म्हटले जाते.आजच्या घडीला मानव हा चंद्रावर जाऊन पोहचला आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.मात्र,आदिवासी दुर्गम भागातील स्थिती आजही भयावह आहे.कुठे रस्तेच नाहीत तर कुठे पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाच नाही; कुठे शाळा आहेत तर वर्गात शिक्षकच नाहीत; रुग्ण आहेत तर रुग्णवाहिकाच गायब आहे; अशा अनेक विविध समस्यांचा डोंगर जिल्ह्यात उभा येऊन ठाकला आहे.असाच प्रकार गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील भटपार गावात उघडकीस आला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात आठ दिवसांपासून संपूर्ण तालुक्यात अतिवृष्टी सुरू आहे.पुराच्या पाण्यामुळे अनेक मार्ग अद्यापही बंद स्वरूपात असल्याने अनेक गावांचा जिल्हा तसेच शहरांशी संपर्क तुटलेला आहे.त्याचा सर्वाधिक फटका भामरागड या नक्षलग्रस्त व अतिदुर्गम गावाला बसला.पर्लकोटा नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने अद्यापही भामरागड शहराचा संपर्क तुटलेलाच आहे. तालुक्यातील घनदाट जंगलातील दुर्गम,अतिदुर्गम गावातील स्थिती भयावह आहे.अशातच मालू केये मज्जी वय ६७ वर्षे,रा.भटपार ता.भामरागड येथील रहिवासी असलेले शेतकरी काल,२६ जुलै रोजी नित्याप्रमाणे शेतात कामासाठी गेले होते.चिखलात पाय घसरून पडल्याने दुखापत झाली.त्यामुळे त्यांचे चालणे,फिरणेही कठीण झाले.वेदनेने विव्हळणाऱ्या पित्याला दवाखान्यात नेण्यासाठी भटपारपासून १८ किलोमीटर अंतरावरील भामरागडला जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.वाहन नव्हते,चिखलात पायपीट करणे हाच मार्ग होता.त्यामुळे त्यांचा मुलगा पुसू मालू मज्जी याने मित्रांच्या मदतीने खाटेची कावड केली व मालू यांना त्यावर झोपवून भामरागडला निघाला. चिखल तुडवत पुसू मालू व त्याचे तीन ते चार मित्र पामुलगौतम नदीतिरी पोहोचले.नदी तुडुंब भरून वाहत होती,पण पुसू मालू व त्याच्या मित्रांनी हिंमत न हारता नावेत खाट टाकून नदी पार केली.तेथून पुन्हा खाटेवरूनच त्यांनी मालू मज्ञ्जी यांना भामरागडच्या ग्रामीण रुग्णालयात नेले.तेथे डॉक्टरांनी तपासणी केली,त्यानंतर एक्सरे काढला. यात त्यांचा पाय फ्रैक्चर असल्याचे निदान झाले.या प्रसंगानंतर पुत्रप्रेमाची तर चर्चा झालीच,पण अतिदुर्गम भागात पुरामुळे रुग्णांचे कसे हाल होत आहेत; हे देखील यामुळे चव्हाट्यावर आले.
मालू मज्जी यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. मात्र,गडचिरोलीचा संपर्क तुटलेला असल्याने मुलगा पुसू मालू मज्जी हा निराश झाला.तात्पुरत्या उपचारानंतर वडिलांना घेऊन तो पुन्हा खाटेची कावड करूनच जड पावलांनी भटपार येथे घरी परतला.

