उद्रेक न्युज वृत्त
मूल(चंद्रपूर) :- वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करण्यास नकार देणाऱ्या मुलांना आता चपराक बसणार असून,शासनाची याकडे करडी नजर आहे.
मागील वर्षी अशाच एका प्रकरणात मुलाला चपराक बसली आहे.मूल तालुक्यातील राजोली येथील भास्कर दामोधर ठिकरे यांनी आईचा सांभाळ करण्यास नकार दिल्यानंतर उपविभागीय अधिकारी मूल यांच्याकडे १७ नोव्हेंबर २०२२ रोजी केलेल्या तक्रारीनुसार संबंधित मुलाला दरमहा ३ हजार रुपये देण्याचा आदेश २५ जानेवारी २०२३ रोजी तत्कालीन उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी दिला होता.यावरून आई- वडिलांचा सांभाळ न करणाऱ्यांना आता शासनाची चपराक बसणार आहे. विशेष म्हणजे,चंद्रपूर जिल्ह्यातील हे पहिलेच प्रकरण असल्याचे म्हटले जात आहे.शासनाने ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरण तथा उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आई वडील आणि ज्येष्ठ पालक तथा नागरिक देखभाल आणि कल्याण कायदा २००७ चे कलम ५ अन्वये आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या व्यक्तीला त्यांच्या उपजीविकेसाठी दरमहा रक्कम त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत बघून देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
मूल तालुक्यातील राजोली येथील वच्छलाबाई दामोधर ठिकरे यांनी आई-वडील ज्येष्ठ पालक तथा नागरिक देखभाल आणि कल्याण कायदा २००७ अन्वये अर्ज दाखल केला.यावर उपविभागीय अधिकारी मूल यांनी वेळोवेळी सर्वांचे मत नोंदवले. गैरअर्जदार मुलगा भास्कर दामोधर ठिकरे याला प्रतिमाह ३ हजार रुपये ५ तारखेच्या आत जमा करण्याचा आदेश २५ जानेवारी २०२३ रोजी दिला. तसेच राहत्या घरातील दोन खोल्यांचा ताबा तसेच औषधोपचाराकरिता दवाखान्यात घेऊन जाणे व त्यासाठी येणारा पूर्ण खर्च करण्यात यावा.त्यात कसूर केल्यास कायदेशीर कारवाईस पात्र राहतील,असेही बजावले.अर्जदाराला मानसिक व शारीरिक त्रास देण्यात येऊ नये; असेही आदेशात नमूद करण्यात आले.या आदेशाने ज्येष्ठ नागरिकांचा सांभाळ करण्यास भावी युवा पिढी पुढे आली तरच समाजातील चित्र बदलेल व आई-वडिलांची हेळसांड करणाऱ्यांना आळा बसेल.

