उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना म्हटले की,काँग्रेसने गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राची जागा हरल्यास राजकीय संन्यास घेऊ; अशी घोषणा केली आहे.तसेच महाराष्ट्र राज्यासह देशभर भाजपविरोधी वातावरण असताना देखिल एक्झीट पोलचे आकडे म्हणजे ‘दाल में कुछ काला है’ असे विधान वडेट्टीवार यांनी केले आहे.
वडेट्टीवार म्हणाले, इंडिया आघाडी विदर्भात १०,तर राज्यात ३५ जागा जिंकेल.प्रचारादरम्यान आम्ही घेतलेल्या सभांना लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. परंतु,सत्ताधाऱ्यांना खूश करण्यासाठी एक्झीट पोलचे आकडे भाजपच्या समर्थनार्थ दिले गेले आहेत. मतमोजणीस कितीही उशीर झाला तरी चालेल,मात्र सी-१७ फॉर्म मशिनबरोबरच लावून येणाऱ्या फॉर्मची आकडेवारी जुळल्याशिवाय एव्हीएम मशिन उघडली जाऊ नये; अशी सूचना आपण केल्याची माहितीही वडेट्टीवार यांनी दिली.
निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना नोटीस बजावली आहे.परंतु भाजप ही निवडणूक धार्मिक मुद्द्यांवर लढत असताना आयोग गप्प का होता, एका मतदारसंघात मतदान सुरु असताना बाजूच्या मतदारसंघात प्रचार सभा घेतल्या गेला,तो आचारसंहितेचा भंग नाही काय? असे प्रश्न देखिल वडेट्टीवार यांनी उपस्थित केले.
गडचिरोली-चिमूर क्षेत्रातील निवडणूक ही लोकांनीच हातात घेतली होती.लोकांमध्ये सत्ताधाऱ्यांविरुद्ध प्रचंड राग होता.असे असतानाही एक्झीट पोल भाजपच्या बाजूने कौल दाखवत असेल तर दाल में कुछ काला है,असे समजण्यास भरपूर वाव आहे.ही निवडणूक काँग्रेस पक्ष हरला तर राजकीय संन्यास घेऊ; अशी भूमिकाही वडेट्टीवार यांनी मांडली.

