उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- शेतकरी बांधवांच्या पदरी नेहमी निराशाच पडलेली दिसून येत आहे.यांचा वाली कुणीही नसल्याने केवळ सगळ्यांकडून भूलथापा देण्याचा हल्ली प्रयत्न सुरू आहे.कित्तेक शेतकरी बांधवांची मुले मोठ-मोठ्या पदावर जरी विराजमान झाले असले तरीही सर्वकाही विसरून केवळ आपलेच घर भरण्यात मग्न आहेत.अशातच हल्ली उन्हाळ्याची चाहूल सुरू झाली असून शेतजमीन चांगलीच तहानलेली आहे.जमिनीला अक्षरश: भेगा पडल्या आहेत.त्यातच सिंचन सुविधांचा अभाव, अनियमित वीज पुरवठा आणि वाढत्या उष्णतेमुळे रब्बी हंगामातील धान व इतर पिके करपू लागली आहेत.त्यामुळे साहेब पिके कशी जगवायची; असा संतप्त सवाल शेतकरी करीत आहेत.
जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात धान व इतर पिके घेतली जातात.यंदा रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी धानासह मूंग,गहू, हरभरा, मका आदी पिके घेतली आहेत.मात्र काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या उष्णतेचा पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. खरिपाप्रमाणेच आता रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना सिंचनाअभावी पिके वाचविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
खरीप हंगामात पीक काढण्याची प्रक्रिया सुरू होणार होती; तेव्हा अवकाळी पावसाने अतोनात नुकसान केले.या नुकसानीतून सावरण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात धान व इतर पिकाची लागवड केली. मात्र यावेळीही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडत आहे.
कृषी पंपांना १२ तासांमध्ये केवळ आठ तास वीज पुरवठा केला जात असल्याने पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. जमिनीची तहानही पूर्णतः भागत नाही.त्यातच दिवसा वीज पुरवठा न करता रात्री वीज पुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांसमोर वन्यप्राण्यांचेही संकट उभे ठाकले आहे.त्यामुळे शेतातील पिके वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करतांना दिसून येत आहे.

