- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-दैनिक देशोन्नती “मनस्विनी साहित्यरत्न पुरस्कार” व दैनिक देशोन्नतीच्या ‘मनस्विनी’ सदरातून आपल्या लेखणीची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या गडचिरोलीतील किरण महादेव चौधरी यांच्या ‘लेखमंजिरी’ या ४५ लेखांच्या वैचारिक लेखसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच सुमानंद भवन,गडचिरोली येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

निसर्ग,स्त्रीजाणीवा,सामाजिक प्रश्न,ऐतिहासिक संदर्भ, संतपरंपरा,वैचारिक आणि सामाजिक विषय अशा विविध विषयांना स्पर्श करणारे ५० लेख या संग्रहात समाविष्ट करण्यात आले आहेत.वाचकांच्या मनात विचारांची नवी पालवी फुलविण्याबरोबरच समाजातील विविध प्रश्नांकडे संवेदनशील आणि चिकित्सक दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न या लेखांमधून करण्यात आला असून सोहळ्यात किरण चौधरी यांना “मनस्विनी साहित्यरत्न पुरस्कारा”ने सन्मानित करण्यात आले.दैनिक देशोन्नतीच्या ‘मनस्विनी’ या लोकप्रिय सदरातून प्रसिद्ध झालेल्या लेखांना पुस्तकाच्या रूपाने एकत्रित करण्याचा हा प्रयत्न असून, ‘लेखमंजिरी’ हा लेखिकेच्या लेखनप्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
या पुस्तकाला दैनिक देशोन्नती ‘मनस्विनी’चे संपादक प्रा.अनिल धामोडे यांची प्रस्तावना लाभली असून, ज्येष्ठ कवी व समीक्षक विनोद नवघडे यांनी पुस्तकाच्या आशयाला योग्य शब्दांत अधोरेखित केले आहे.विशेष योगायोग म्हणजे याच दिवशी दैनिक देशोन्नती ‘मनस्विनी’चा श्रावणी सोहळा आणि लेखिकेचे पती महादेव चौधरी यांचा वाढदिवसही होता.त्यामुळे हा दिवस लेखिका आणि त्यांच्या कुटुंबासाठी तसेच साहित्यप्रेमींसाठी विशेष आनंदाचा ठरला.
‘लेखमंजिरी’ हे केवळ लेखांचे संकलन नसून,अनुभव, संवेदना,सामाजिक भान आणि वैचारिक चिंतन यांची सुंदर गुंफण असल्याची भावना उपस्थित साहित्यप्रेमींनी व्यक्त केली.१६० पृष्ठे,५० लेख आणि २५० रुपये किंमत असलेल्या या पुस्तकाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून,मराठी साहित्यप्रेमींनी ‘लेखमंजिरी’चे आवर्जून वाचन करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी आमदार विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम,दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक तथा शेतकरी नेते लोकनेते प्रकाश पोहरे,जिल्हा प्रतिनिधी प्रा.अनिल धामोडे,मनस्विनी संयोजिका सुलभा धामोडे,प्रा.नरेंद्र आरेकर,महादेव चौधरी आदींची उपस्थिती लाभली. विशेष उपस्थितीत सर्वांचे लक्ष केंद्रित करणारी इंडियन आयडल फायनलीस्ट गायिका भाग्यश्री टिकले यांच्या गायनाने सर्वांचे लक्ष वेधले.या प्रकाशन सोहळ्यामुळे किरण चौधरी यांच्या साहित्यिक वाटचालीतील आणखी एक महत्त्वपूर्ण अध्याय लिहिला गेला असून,त्यांच्या लेखणीचा प्रवास अश्याच प्रकारे अधिक समृद्ध राहून पुढील वाटचालीस विविध साहित्यप्रेमींकडून किरण चौधरी यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

- Advertisement -

