- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-जिल्ह्याच्या गायमुख पर्यटनस्थळासाठी प्रसिद्ध असलेल्या नरखेड तालुक्यात अजब प्रेमाची गजब धक्कादायक कहाणी उघडकीस आल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरू लागला आहे.विशेष म्हणजे,नातू-पतू,सून बोवा असलेल्या एका ७८ वर्षीय आजोबाने प्रेमात अडसर ठरणाऱ्या ३० वर्षीय प्रेमिकाच्या ३४ वर्षीय पतीचा काटा काढण्याचे ठरवून शेतशिवारात दुपट्ट्याने गळा आवळून खून केला असल्याची घटना काल मंगळवारी नरखेड पोलीस तपासात उघडकीस आली आहे.प्रकरणात आजोबा प्रियकर व तरुण प्रेयसीला नरखेड पोलिसांनी अटक करून भारतीय न्याय संहिता (बीएनएस)कलम १०३(१),३(५) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.शिवशंकर गणुजी धुर्वे वय ३४ वर्षे असे मृताचे नाव आहे.तर आरोपींमध्ये शांताराम पुरणसिंग दिदावत वय ७८ वर्षे व त्याची प्रेयसी म्हणजेच शिवशंकरच्या ३० वर्षीय पत्नीचा समावेश आहे.हे तिघेही रा.बेलोना,ता. नरखेड,जि.नागपूर येथील रहिवासी आहेत.
अधिक माहिती अशी की, ७८ वर्षीय आजोबा आरोपी शांताराम दिदावत हा भाजप पदाधिकारी उकेश चव्हाण यांच्याकडे दिवाणजी म्हणून,तर शिवशंकर धुर्वे सालगडी म्हणून काम करायचा.शिवशंकर त्याच्या पत्नीसोबत उकेश चव्हाण यांच्या गंगालडोह शिवारातील शेतात राहायचा.दोघेही एकाच मालकाकडे कामाला असल्याने त्यांची आपसात ओळख होती.त्यातच शांताराम व शिवशंकरच्या पत्नीचे आपसात सूत जुळले.दोघेही शरीरसंबंध करीत असतांना शिवशंकरने चारदा प्रत्यक्ष बघितले होते.तो आपल्या प्रेमात अडसर ठरत असल्याचे शांतारामला वाटत असल्याने त्याने शिवशंकरला संपविण्याची योजना आखली.त्यानुसार शांतारामने रविवारी शिवशंकरला गायमुख शिवारातील शेतात नांगरणी करण्यासाठी पाठविले.भाजप पदाधिकारी उकेश चव्हाण यांची गायमुख (ता.नरखेड) शिवारात शेती आहे.दुपारी शिवशंकरची पत्नी त्याच्या जेवणाचा डब्बा घेऊन शेतात गेली.तिच्या मागे शांताराम शेतात पोहोचला.त्याने शिवशंकरचा दुपट्ट्याने गळा आवळून खून केला व घरी परत आला.त्यानंतर त्याने मयूर बावणे यास शिवशंकर शेतात दारू पिऊन पडून असेल.त्याला बैलगाडीत टाकून घेऊन ये,अशी सूचना केली.त्यानुसार मयूर बावणे शेतात गेला असता शिवशंकर हा निपचित पडून होता.घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नरखेड शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. त्याचा मृत्यू गुदमरून झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होताच पोलिसांनी गावात चौकशी सुरू केली.त्यांना आरोपी आजोबा आणि विवाहित तरुणी या दोघांची प्रेमकथा कळताच त्यांनी दोघांना ताब्यात घेतले व अवघ्या दोनच दिवसांत हत्येचे बिंग फुटले.
- Advertisement -

