उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- जिल्ह्यात नक्षलवादी चळवळीच्या उदयापासून प्रत्येक घडामोडीचा साक्षीदार असलेला जहाल नक्षल नेता जोगन्ना ३० एप्रिल रोजी छत्तीसगडमधील अबुझमाडच्या जंगलात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाला. या चकमकीत एकूण दहा नक्षलवाद्याना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले. त्यापैकी दोघांची ओळख पटली असून त्यात विभागीय समिती सदस्य जोगन्ना उर्फ नरसय्या आणि विनय उर्फ अशोक यांचा समावेश आहे.१९८० च्या काळात तेव्हाच्या आंध्रप्रदेशातून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी चळवळीचा शिरकाव झाला. त्यात बरेच उच्च शिक्षण घेतलेले तरुण, तरुणीदेखील चळवळीत सहभाग झाले. यात तेलंगणातील बेलमपल्ली येथील रहिवासी असलेला जोगन्ना याचा देखील समावेश होता. शिक्षण कमी असल्याने जोगन्ना चळवळीत मोठ्या पदावर गेला नाही.परंतु प्रत्येक योजनेत त्याचा सहभाग असायचा. जहाल नक्षलवादी नर्मदाक्का, शंकर, तारक्का यांच्यासह चळवळीतील वरिष्ठ नेत्यांसोबत मिळून त्याने गडचिरोलीत नक्षल चळवळीचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला. दक्षिण आणि उत्तर गडचिरोलीत त्याचा वावर होता. मधल्या काळात पोलिसांच्या कारवाईत अनेक मोठे नक्षल नेते ठार झाले.त्यामुळे तो भूमिगत होऊन अबुझमाडमध्ये वास्तव्यास होता. वयाची सत्तरी पार केलेला जोगन्नाला शेवटच्या काळात एटापल्ली, धानोरा आणि अहेरी तालुक्यात पहिल्या गेले. मात्र तो पोलिसांच्या हाती लागला नाही. गडचिरोलीत त्याच्यावर शंभरहून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर शासनाने २० लाखांपेक्षा अधिक बक्षीस जाहीर केले होते.त्याच्या मृत्यूने नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला आहे. त्याच्यासोबत ठार झालेला विनय हा नक्षल्यांचे आर्थिक नियोजन सांभाळायचा. विभागीय कमिटीचा सदस्य जोगन्ना हा मुळचा आंध्र प्रदेशातील रहिवासी असला तरी त्याने गडचिरोली जिल्ह्यासह छत्तीसगडमध्ये अनेक कारवायांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यानंतर त्याने आपले बस्तान छत्तीसगडमध्ये हलविले होते.मल्लेश आणि विनय हेसुद्धा गडचिरोली जिल्ह्यात सक्रिय होते. मात्र पोलिसांचा दिवसेंदिवस वाढलेला दबाव पाहून त्यांनीही गडचिरोली जिल्ह्यातून काढता पाय घेत छत्तीसगडमध्ये आश्रय घेतला होता.

