- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी धान विक्री करून दोन महिने झालीत.मात्र,अद्यापही शासन स्तरावरून धानाचे चुकारे अदा करण्यात आली नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता.सदरची बाब आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या निदर्शनास येताच त्यांच्या अथक प्रयत्नांनी अखेर शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली असून गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आज,बुधवार १२ फेब्रुवारी पासून धानाचे चुकारे मिळण्यास सुरुवात झाली आहे.जिल्ह्यातील आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशन मिळून धानाच्या चुकाऱ्याच्या एकूण १३८ कोटी रुपयांच्या रकमेपैकी १२६ कोटी रुपयांची रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यात वितरीत करण्यात आली आहे.उर्वरित १२ कोटी रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वितरीत करण्यात येणार असल्याचे आमदार रामदास मसराम यांनी कळविले आहे.
शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये,यासाठी शासन आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत शासकीय धान खरेदी केंद्रावरून,धान खरेदी करते.बरेच शेतकरी धान विक्रीपासून वंचित असल्याने शासनाने धान खरेदीला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे.त्यातच दोन महिन्यांपूर्वी शासकीय धान खरेदी केंद्रावर धान्य विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात चुकारे जमा झाले नसल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते.अगोदरच उसनवारी करून तसेच बँकांकडून कर्ज उचलून शेतकऱ्यांनी शेती पिकवली.धान्य विक्री चुकाऱ्यांच्या विलंबामुळे शेतकऱ्यांना कर्जफेड,हात उसनवारी घेतलेली रक्कम तसेच शेतीची पुढील तयारी आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता.चुकारे लवकर मिळणे अपेक्षित असतांनाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात धान चुकाऱ्यांची रक्कम अद्यापही आलेली नसल्याने गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या धानाचे चुकारे तात्काळ जमा करण्यात यावे; अन्यथा हजारो शेतकऱ्यांसह आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी ४ फेब्रुवारी २०२५ ला स्पष्ट केले होते.तत्पूर्वी आमदार मसराम यांनी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धान्य विक्रीचे चुकारे मिळावे,यासाठी राज्याचे डीएमओ हनुमंत पवार तसेच राजश्री सारंग मुंबई टीडीसी तथा गडचिरोलीचे रिजनल मॅनेजर यांचेकडे सतत पाठपुरावा करून धानाचे चुकारे मिळण्यास प्रयत्न केले.जानेवारी २०२५ ला उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन,२७ जानेवारी २०२५ रोजी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याशी संवाद,३१ जानेवारी २०२५ रोजी राज्याचे कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांच्यासोबत दूरध्वनीद्वारे संपर्क साधून तात्काळ चुकारे मिळविण्यासाठी प्रयत्न,३ फेब्रुवारी २०२५ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करून सतत पाठपुरावा केला होता.त्यामुळे आमदार रामदास मसराम यांच्या अथक प्रयत्नांनी शेतकऱ्यांच्या धानाच्या चुकाऱ्यांचे १२६ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले असून आजपासून गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धानाचे चुकारे मिळण्यास सुरुवात झाल्याने शेतकरी बांधवांनी आमदार मसराम यांचे आभार व्यक्त केले आहे.
- Advertisement -

