उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- विमुक्त जाती,भटक्या जमाती व धनगर समाज प्रवर्गातील समाज बांधवांनी घरकुल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.ग्रामीण क्षेत्रासाठी संबंधित ग्रामपंचायती अंतर्गत ठराव घेऊन घरकुल योजनेकरीता पात्र अर्जदारांचे ग्रामपंचायतीच्या माध्यमाने पंचायत समिती, गटविकास अधिकारी यांचेमार्फत सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयास यादीसह प्रस्ताव सादर करावे.
विमुक्त जाती,भटक्या जमाती तसेच धनगर समाज या प्रवर्गातील कुटुंबाचे राहणीमान उंचावणे,त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढुन त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी. त्यांना विकासाच्या मुळ प्रवाहात येता यावे; या उद्देशाने राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ग्रामीण भागातील विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना तसेच धनगर समाज भटक्या जमाती-क प्रवर्गाच्या विकासासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येत आहे.
ग्रामीण भागात किमान १० कुटुंबासाठी सामुहिक वसाहत योजना राबवून अथवा रमाई आवास योजनेच्या धर्तीवर वैयक्तिक स्वरुपात घरकुलाचा लाभ देण्यात येतो.यासाठी सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र,कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये १.२० लाख पेक्षा कमी असल्याचे उत्पन्न प्रमाणपत्र तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र,कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने महाराष्ट्र राज्यात इतर कोणत्याही ठिकाणी घरकुल योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबतचे १०० रु.स्टॅम्प पेपरवर शपथपत्र, लाभार्थी कुटुंबाचे स्वत:चे मालकीचे घर,भुखंड असल्याचा पुरावा,नमुना-८ किंवा ७-१२ उतारा दस्त नोंदणीची प्रत,घराचे सद्यास्थितीचे छायाचित्र, ग्रामसभेचा ठराव,अर्जदाराचे आधार ओळखपत्र,बँक पासबुक,राशन कार्ड,जॉबकार्ड,घरट्याक्स पावती आदी कागपत्रासह अर्ज संबंधित ग्रामपंचायतीमध्ये सादर करावे.अधिक माहितीकरीता ०७१३२-२२२१९२ या क्रमांकावर संपर्क साधावा; असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ.सचिन मडावी यांनी केले आहे.

