- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विजेचा कडकडाट आणि अंगावर वीज पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी,असे आवाहन गडचिरोली जिल्हा प्रशासनाने केले आहे.यासाठी प्रशासनाने काही महत्त्वाच्या सूचना केल्या असून,त्याचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाच्या सूचनेनुसार,विजेचा धोका टाळण्यासाठी शेतात काम करणाऱ्यांनी किंवा तलावात कार्यरत असलेल्या व्यक्तींनी त्वरीत कोरड्या व सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा.शेतात काम सुरू असतांना वीज पडण्याची शक्यता असल्यास सुरक्षित स्थळी पोहचण्याचा प्रयत्न करावा,अन्यथा जिथे आहात तिथेच थांबावे.अशा वेळी पायाखाली लाकूड, प्लास्टिक, गोणपाट अथवा कोरडा पाला ठेवावा आणि दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर हात ठेवून डोके जमिनीकडे झुकवावे,मात्र डोके जमिनीला लागू नये.
प्रशासनाने धातूपासून बनलेल्या कृषी यंत्र,लोखंडी पाईप यांसारख्या वस्तूंपासून दूर राहण्याचे निर्देश दिले आहेत.तसेच शेत,गाव,घर,बागेभोवती लोखंडी तारांचे कुंपण न घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे.कारण अशा तारांमुळे वीज सहजतेने आकृष्ट होते.धातूच्या दांडीची छत्री वापरणे,विजेच्या खांबाजवळ उभे राहणे, झाडाखाली अथवा उंच जागेवर जाणे टाळावे.
घरात असतांना विजेवर चालणारी उपकरणे,पाण्याचे नळ,टेलिफोन,फ्रिज यांना स्पर्श न करता त्यांच्यापासून दूर राहावे.कपडे वाळविण्यासाठी विजेवर न ठेवता सुतळीचा वापर करावा.प्रशासनाने घरोघरी वीज अटकाव यंत्रणा बसवण्याचा सल्लाही दिला आहे.
वृक्षांच्या सुरक्षेसाठी तांब्याची एक तार झाडाच्या फांदीवर बांधून तिचे दुसरे टोक जमिनीत खोलवर पुरण्याची सूचना देण्यात आली आहे.त्यामुळे वीज झाडावर न पडता सुरक्षिततेची हमी मिळते.वाहनातून प्रवास करत असतांना वीज सुरू असल्यास शक्यतो वाहनातच थांबावे.वाहनाच्या बाहेर राहण्याची गरज भासल्यास,कोणतेही धातूचे उपकरण हातात न ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.जंगलात असाल तर उंच झाडांपासून दूर राहून कमी उंचीच्या झाडांचा आसरा घ्यावा.पाण्याचे स्त्रोत, दलदलीची ठिकाणे,अथवा मोकळ्या जागा टाळाव्यात.मात्र मोकळ्या आकाशाखालीच राहणे भाग असल्यास खोलगट जागेचा निवास करावा. एकाच जागी अनेक व्यक्ती एकत्र उभे राहू नयेत,दोन व्यक्तींमधील अंतर किमान १५ फूट असावे.पाण्यात पोहत असलेल्यांनी अथवा मासेमारी करत असलेल्यांनी तात्काळ बाहेर यावे.
- Advertisement -

