उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :- लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील प्रचाराला काल, शनिवारी पूर्णविराम मिळाला.मुंबईतील सहा जागांसह ठाणे,कल्याण,भिवंडी,पालघर, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या १३ लोकसभा मतदारसंघांत उद्या सोमवार, २० मे रोजी मतदान होणार आहे.पाचव्या टप्प्यातील प्रचारासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशीसुद्धा दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडल्याने राजकीय तापमानसुद्धा वाढल्याचे चित्र आहे.प्रत्यक्ष प्रचाराचा कालावधी संपला असला,तरी आता पुढील दोन दिवस छुप्या प्रचाराला गती येणार आहे.त्यामुळे निवडणूक आयोगासह संपूर्ण निवडणूक यंत्रणा सतर्क झाली आहे.शनिवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीने संयुक्त पत्रकार परिषद घेत महायुतीवर विशेषतः भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे,ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,राष्ट्रवादी पवार गटाच्या शरद पवारांसह महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचा समाचार घेतला.त्यानंतर,पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर पश्चिम ९ मुंबई लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या मतदारसंघात रोड शो केला.मुंबईत रोड शो तसेच ठाकरे गटाच्या उमेदवारांसाठी दक्षिण मध्य आणि दक्षिण नवी मुंबईत सभा घेतल्या.या सभांच्या माध्यमातून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली.या प्रचाराची सांगता उद्धव ठाकरे यांनी मुंबादेवी मंदिरात दर्शनाने केली. यावेळी त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे,आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे उपस्थित होते.

