- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-शिकून मोठे व्हायचे असेल तर, शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही.मात्र,शाळेत विद्यार्थी आहेत,पण शिकवण्यासाठी शिक्षकच नसतील तर शाळेत जाण्याचा प्रश्नच उरत नाही.त्यातच,शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या शाळेत केवळ एकच शिक्षक असेल तर तेथील अवस्था कशी असणार? अश्याच प्रकारे गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील संवेदनशील राजोली-भरनोली गावातील प्राथमिक शाळेत पहिली ते सातवीपर्यंत एकूण १२४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.पण,त्यांना शिकवायला फक्त एकच शिक्षक आहे.एका वर्गात वर्णमाला,तर दुसऱ्या वर्गात गणिताचे पाढे आणि मधल्या वर्गात इतिहासाच्या गोष्टी या सगळ्यांचा ताळमेळ एकट्या गुरुजींच्या भरवशावर चालत होता.सदरचा प्रकार गेल्या वर्षभरापासून येथे सुरू होता.शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची मागणी वांरवार पालक व शाळा व्यवस्थापन समितीने करूनसुद्धा शिक्षण विभागाने दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आता “गाव करी ते राव न करी” या म्हणी प्रमाणे लावारे शाळेचे दरवाजे, ठोका कुलूप,असे म्हणत काल सोमवारी शाळेला कुलूप ठोकले अन् शाळेजवळच ठिय्या मांडला.याची माहिती जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांधे आणि पंचायत समिती सदस्यांना कळताच त्यांनी राजोली येथे पोहोचत पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे म्हणणे ऐकून घेतले.त्यांनी त्वरित अर्जुनी मोरगावचे गटशिक्षणाधिकारी, गट विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधला.यानंतर त्यांनी चर्चा करण्यासाठी दोन शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना राजोली येथे पाठविले व त्वरित एका शिक्षकाची नियुक्ती केली,तर गुरुवार २५ डिसेंबरला दुसरा शिक्षकसुद्धा शाळेत रुजू होईल,असे लेखी पत्र दिल्याने गावकऱ्यांनी शाळेच्या प्रवेशद्वाराला ठोकलेले कुलूप उघडून आंदोलनाची सांगता केली.
- Advertisement -

