उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
गडचिरोली :- गोर-गरीब तसेच सर्वसामान्य नागरिकांची मुले-मुली मराठी शाळेत शिक्षण घेत असून ज्या शाळेत शिक्षण देणारे शिक्षकच आपल्या पाल्यांना स्वतः शिक्षक असलेल्या शाळेत शिक्षणासाठी पाठवीत नसतील तर ही किती शोकांतिका आहे? मराठी शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस घटत आहे.एकीकडे मराठी शाळा वाचविण्याचा नारा दिला जातोय तर दुसरीकडे मराठी शाळेवरील शिक्षकच आपल्या पाल्यांना खासगी इंग्रजी शाळेत पाठवून शिकवत असल्याचे दिसत आहे.त्यामुळे शिक्षकच मुलाला मराठी शाळेत शिक्षण घेण्यासाठी पाठवीत नसल्याने इतर पालकांची देखील द्विधा मनस्थिती होत आहे.
पूर्वी शिक्षक वर्ग गावात मुख्यालयी वास्तव्यास राहून अनेक विद्यार्थी वर्गांना घडविण्याचे काम करीत होते.त्यानुसार मराठी शाळेत शिक्षण घेणारे मोठ-मोठे अधिकारी,कर्मचारी यांनी मान उंचावली आहे.मात्र सध्या स्थितीत अनेक शिक्षक मुख्यालयी वास्तव्यास राहत नसल्याने विद्यार्थी वां अधिकारी,कर्मचारी बनने कठीण झाले आहे.
मराठी शाळा वाचविण्यासाठी पालकांनी मुलांना मराठी शाळेत पाठवा; असे सांगावे लागते.मराठी शाळांची पटसंख्या वाढेल तर शिक्षकांची नोकरी वाचेल; अशी परिस्थिती असतांना मात्र येथे असे सांगणाऱ्या शिक्षकांचीच मुले खासगी शाळेत शिकत आहेत.तर मग शिक्षक इतर पालकांना मुलांना मराठी शाळेत दाखल करण्यासाठी कसे बोलणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एक मराठी शाळा का बंद पडते, याचाही विचार करावा लागणार आहे. गावातील याच मराठी शाळांनी येथील पिढ्या घडवल्या.आज याच सरकारी शाळांवर गंडांतर आले आहे.शिक्षण विभागासह कोणालाही त्याचे सोयरसुतक असल्याचे दिसत नाही.
गावोगावच्या मराठी शाळा बंद पडतात,याचे खापर केवळ इंग्रजी माध्यमाकडे मुलांना वळवणाऱ्या पालकांवर फोडता येणार नाही; मुळात या पालकांना इंग्रजी माध्यमाकडे का वळवावे वाटते; ती कारणे आधी तपासावी लागतील.मराठी शाळेतील शिक्षकच आपल्या पाल्यांना स्वतः शिकवत असलेल्या शाळेत दाखल करत नसतील तर इतर पालकांनी कोणत्या विश्वासाने आपल्या पाल्यांना मराठी शाळेत शिकवावे; असा प्रश्न पडणे स्वभाविक आहे.त्यासाठी सर्व प्रथम मराठी शाळांवरील शिक्षकांनी आपण ज्या मराठी शाळांवर नोकरी करून आपला प्रपंच चालवत आहो; याचे भान ठेवून मराठी शाळेत आपल्या पाल्यांना दाखल करून घेणे गरजेचे आहे.

