उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- बुद्धपौर्णिमा आणि पाणवठ्यावरील निसर्ग अनुभव कार्यक्रम हे एक वेगळे समीकरण झाले आहे. बुद्धपौर्णिमेची रात्र वर्षातील सर्वाधिक लख्ख प्रकाशाची रात्र समजल्या जाते.त्यामुळे यादिवशी महाराष्ट्र वन विभागाकडून वन्यप्राण्यांची नोंद करण्यात येते.या उपक्रमाचा प्रारंभ बुधवारी, २२ मे रोजी दुपारी ३ वाजता करण्यात आले.पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत ३७, उमरेड करांडला व्याघ्र प्रकल्पांतर्गत ३४ आणि बोर (वर्धा) व्याघ्र प्रकल्पांतर्गत ३५ मचाणांची व्यवस्था या उपक्रमासाठी करण्यात आली आहे.
वन्यजीव प्रेमींसाठी हा संपूर्ण अनुभव थरारक आणि अतिशय उत्सुकतेचा असल्याने हे क्षण अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने अर्ज वन विभागाला प्राप्त होतात.त्याची छाननी करून त्यानंतर काही अर्जावर शिक्कामोर्तब करण्यात येते.त्यानंतर एका मचाणावर एक निसर्गप्रेमी आणि वन्य रक्षकाची नेमणूक होते.विशेष म्हणजे पेंचसह उमरेड करांडला, पवनी आणि बोरच्या सर्वच वनपरिक्षेत्रात जय्यत तयारी करण्यात येत आहे.खास मचाणांची व्यवस्था करण्यात येते.पाणवठ्याजवळ उभारण्यात आलेल्या मचाणावरून रात्रीच्या अंधारात पाणी पिण्यास येणाऱ्या वन्यप्राण्यांची नोंद करण्यात येते.
प्राणिगणना उन्हाळ्यातच करण्याचे मुख्य कारण म्हणजे,या काळात जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटतात आणि पाण्याचा तुटवडा भासतो.अशावेळी जंगलातील बहुतेक प्राणी पाणवठ्यावर येतात.त्यामुळे वन्यजीव प्रेमी आणि वन कर्मचारी दुपारपासून मचाणांवर मुक्काम करतात.रात्री पाण्यासाठी पाणवठ्यावर प्राणी आले की त्यांच्या नोंदी घेतल्या जातात.
नासाची मिल्कमूनची व्याख्या अशी आहे👇
बौद्धपौर्णिमेचा चंद सर्वात प्रकाशमय चंद्र म्हणून ओळखण्यात येतो.अंतराळ संस्था नासाने यादिवशीच्या चंद्राची व्याख्या कॉर्नमून किंवा मिल्कमून म्हणूनही केली आहे.यंदाचा चंद्र सुमारे तीस टक्के अधिक चमकणार असल्याचे नासाकडून सांगण्यात आले आहे.अशा बौद्धपौर्णिमेच्या रात्री वन विभागाने निसर्ग अनुभव कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

