उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- देशाच्या जडणघडणीत अनेक महान लोकांनी प्राणाची आहुती दिली.त्यांच्या स्मृति जपण्यासाठी तसेच विविधतेने नटलेल्या या देशाच्या समृद्धतेची साक्ष देणारी अनेक भागातील माती,श्रद्धास्थान असणाऱ्या धार्मिक स्थळांची माती अमृत कलशाच्या माध्यमातून देशाची राजधानी नवी दिल्लीत गोळा केली जात आहे. तेथील अमृत वाटीका बगिच्यात या मातीचा सुगंध दरवळून तो सर्वांना आपलेपणाची भावना देईल,असा विश्वास खा.अशोक नेते यांनी व्यक्त केला.
जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातील धार्मिक स्थळांमधील मातीने भरलेले अमृत कलश बुधवारी गडचिरोलीत एकत्रित करून त्यांचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले होते.’माझी माती, माझा देश’ या उपक्रमांतर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक तालुक्यातील महत्वाच्या धार्मिक स्थळावरून गोळा केलेली माती या कलशात गोळा केली होती. सर्वप्रथम शहीद भगतसिंग आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद संकूल शाळा कॉम्प्लेक्स येथील विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्याने वाजतगाजत १२ कलश नियोजन भवनात पोहोचविण्यात आले. याप्रसंगी धरती मातेचरणी पंचप्राण शपथ घेतली.

