- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- “जनगणना ही शासनाच्या नियोजन प्रक्रियेचा अत्यंत महत्त्वाचा पाया असून या कार्याची अचूकता व पारदर्शकता अत्यंत आवश्यक आहे. प्रशिक्षणातील सर्व बाबी आत्मसात करून जनगणना कार्य विहीत वेळेत आणि जबाबदारीने पूर्ण करा,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
जनगणना संचालनालय,मुंबई व जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने २६ ते २८ मार्च २०२६ या कालावधीत जनगणना-२०२७ प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की,यावेळी होणारी जनगणना पूर्णपणे डिजिटल स्वरूपात राबविण्यात येणार असून त्यासाठी तांत्रिक कौशल्य व अचूक माहिती संकलन अत्यावश्यक आहे.प्रशिक्षणार्थींनी प्रत्येक बाब बारकाईने समजून घेतली पाहिजे, जेणेकरून प्रत्यक्ष काम करतांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.जनगणना प्रक्रियेत लहानसहान त्रुटीदेखील भविष्यातील धोरणात्मक निर्णयांवर परिणाम करू शकते,त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीची जाणीव ठेवून काम करावे,असेही त्यांनी नमूद केले.
या प्रशिक्षणात जिल्ह्यातील सर्व जनगणना अधिकारी, लिपीक व तांत्रिक सहाय्यक यांनी सहभाग नोंदविला. प्रशिक्षणादरम्यान जनगणना प्रक्रियेतील विविध टप्पे, माहिती संकलन पद्धती तसेच डिजिटल प्रणालीचा वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणासाठी जनगणना संचालनालय,मुंबई येथील सहाय्यक संचालक जोगेंद्र तामगाडगे व चेतन गायधाने हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी आशिष वानखेडे व तहसिलदार संतोष आष्टीकर यांनीही प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे निरसन केले.
“जनगणना-२०२७” ही देशातील १६ वी व स्वातंत्र्यानंतरची ८ वी जनगणना असून ती दोन टप्प्यांत पार पडणार आहे.या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जनगणनाकार्य अधिक सक्षम व परिणामकारक होण्यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
- Advertisement -

