उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-आठ वर्षांपूर्वी नक्षल्यांची हिंसक चळवळ सोडून गावी शेती करणाऱ्या आत्मसमर्पित नक्षलवाद्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हा थरार भामरागड तालुक्यातील छत्तीसगड सीमेवरील आरेवाडा येथे २६ जुलैच्या पहाटे घडला. नऊ दिवसांपूर्वी भामरागड तालुक्यातच चकमकीत १२ नक्षल्यांचा खात्मा झाला होता.हा वार जिव्हारी लागल्याने ही हत्या झाल्याचा अंदाज आहे.
जयराम कोमटी गावडे वय ४० वर्षे,रा.आरेवाडा ता. भामरागड,असे मृताचे नाव आहे.तो पूर्वी नक्षल्यांसाठी काम करायचा.मात्र,२०१६ मध्ये पत्नीसह त्याने आत्मसमर्पण केले होते.त्यानंतर तो गावी शेती करत होता.छत्तीसगड सीमेवरील एटापल्ली तालुक्यातील जारावंडी येथील वांडोली जंगल परिसरात १७ जुलै रोजी पोलिस व माओवाद्यांत चकमक उडाली होती. यात पोलिसांच्या सी- ६० जवानांनी माओवाद्यांना जशास तसे उत्तर दिले होते.यात १२ नक्षलवादी ठार झाले होते तर एक पोलिस अधिकारी व दोन जवान जखमी झाले होते.दरम्यान,यानंतर माओवादी बिथरले आहेत.पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून जयराम गावडे यास नक्षल्यांनी अत्यंत निर्दयीपणे गोळ्या झाडून संपविले.त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

