उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :- येथील नगरपालिकेत गत दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून प्रशासक राज आहे.पालिकेचे नवीन मुख्याधिकारी २६ फेब्रुवारीला रूजू झाले. त्यानंतर निवडणुकीच्या कामांचा बहाणा करून ते गायब राहिले.आता निवडणूक संपून महिना लोटत असतानाही मुख्याधिकारी पालिकेतून गायब आहेत. त्यामुळे नागरिकांची कामे खोळंबली.त्या कामांना गती मिळावी म्हणून शिवसेनेच्यावतीने (उबाठा) ‘मुख्याधिकारी दाखवा,१,१०० मिळवा’ अशा आशयाचे स्टिकर मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून चिकटवण्यात आले.गोंदिया नगरपालिकेचे मुख्याधिकारी बल्लाळ यांनी २६ फेब्रुवारीला पदभार सांभाळला.तेव्हापासून ते नगरपरिषदेची पायरीही चढले नाहीत.निवडणुकीच्या नावाखाली नागरिकांची कामे होत नव्हती.१९ एप्रिलला मतदान पार पडले. त्याला आता तब्बल महिनाभराचा काळ लोटला. तरीदेखील मुख्याधिकारी कार्यालयात येत नाहीत. नगरपालिकेची निवडणूक झाली नसल्याने पालिकेत प्रशासक राज आहे.
त्यामुळे कुणी बोलणाराच नसल्यामुळे आणि आचारसंहिता असल्याने मुख्याधिकारी त्याचा पुरेपूर लाभ घेत आहेत.मात्र त्यांच्या अनुपस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे खोळंबली आहेत. कर्मचारीदेखील कार्यालयातून बेपत्ता असतात. आरोग्य,स्वच्छता,वीज,पाण्याची शहरात बोंबाबोंब आहे.अशात मुख्याधिकारी तथा प्रशासकच बेपत्ता असल्याने मुलभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाले.त्यामुळे या बाबीला घेऊन शिवसेनेचे युवासेना प्रमुख हरिश तुळसकर यांच्या नेतृत्वात मंगळवारी (दि.१४) मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात त्यांच्या खुर्चीला हार घालून त्यावर ‘मुख्याधिकारी दाखवा,१,१०० मिळवा’ असे स्टिकर चिकटवले.त्यानंतर बुधवारी (दि.१५) मुख्याधिकारी सकाळीच पालिकेत आल्याचे दिसून आले.

