उद्रेक न्युज वृत्त :-
छत्रपती संभाजी नगर :-
परीक्षा तुम्ही घेतली,उत्तरपत्रिका,उत्तरसूची तुमच्याकडे कॅमेरा तुमचा,डिव्हीआर तुमच्याकडे आणि पेपर फुटल्याची पुरावे विद्यार्थ्यांना मागता? राजकारण कशाला करता,असा संतप्त सवाल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी विद्यार्थ्यांनी राज्य सरकारला केला.तलाठी भरती प्रक्रियेतील गोंधळाबाबत सवाल करत शेकडो विद्यार्थी मंगळवारी रस्त्यावर उतरले. परीक्षा, अभ्यास सोडून विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच उतरायचे का? असा सवाल करत तलाठी भरती प्रक्रिया रद्द करा? एसआयटी चौकशी करा? अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.नोकरी विकली जात आहे, तुमचे कार्यकर्ते दहा-वीस लाख रुपये घेऊन मुलांना पास करून देतात त्यांना आवरा? अशा भावनाही विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
राज्यातील तलाठी भरती प्रक्रियेतील गोंधळावरुन स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.विद्यार्थी कृती समितीने ठिय्या आंदोलनाची हाक दिली. शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. क्रांती चौकात झालेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांनी तलाठी, पोलिस भरतीसह विविध पदांच्या भरती प्रक्रियेतील गोंधळ मांडला. बहुतांशी विद्यार्थिनीने तलाठी भरतीवरुन सरकार पुरावे मागत असल्याचे सांगत संताप व्यक्त केला.
सर्वकाही सरकारकडे असताना सरकार आम्हालाच पुरावे मागते आहे. तलाठीसह सारथी, बार्टी, महाज्योती प्रवेशपूर्व परीक्षेतील गोंधळाचा उल्लेख करत परीक्षेच्या पारदर्शकतेवर विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केले.परीक्षा, अभ्यास सोडून विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच उतरायचे का, आंदोलनच करायचे का असा सवाल ही विद्यार्थ्यांनी केला.आमचे आई-वडिल शेतकरी आहेत.काबाडकष्ट करून आम्हाला शिकवता याची जाणिव आम्हाला आहे.परीक्षेत तुम्ही तुमचे कार्यकर्ते लावता.दहा,वीस लाख रुपये वसूल करता आणि मुलांना पास करून देता; आरोपही विद्यार्थ्यांनी केला.यावेळी प्रा. एच. एम. देसरडा, प्रा. विठ्ठल कांगने, कृती समितीचे प्रकाश उजगारे,राहुल मकासरे,सिद्धार्थ पाणबुडे आदींची उपस्थिती होती.

