उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- रेशन दुकानातील ग्राम पातळीवरील दक्षता समित्यातील अध्यक्ष,सचिव व सदस्य नामधारी असल्याने रेशन दुकानातील दक्षता समित्या केवळ कागदोपत्री असल्याचे दिसून येत आहे.
ग्राम पातळीवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत रेशन दुकानांतून वितरण करण्यात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंवर देखरेख ठेवण्याकरिता अध्यक्ष,सचिव,सदस्य अशी १२ अशासकीय पद असलेली दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या.अशासकीय समितीमध्ये गावातील अध्यक्ष सरपंच,तलाठी सचिव,सदस्यांमध्ये विविध कार्यकारी सोसायटी,तीन महिला,विरोधी पक्षाचे दोन सदस्य, अनुसूचित जाती प्रतिनिधी,अनुसूचित जमाती प्रतिनिधी व एक सामाजिक कार्यकर्ता इत्यादींचा समावेश आहे.या समितीचे कार्य शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसार जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा रास्त भाव दुकानांतून केला जातो किंवा नाही तपासणे,बनावट,खोट्या शिधापत्रिका व शिधापत्रिका न मिळालेल्या गरजू रहिवासी याबाबत आढावा घेणे,धान्य दुकानातून गैरप्रकारांना आळा घालणे,गावातील प्राप्त तक्रार नोंदवही तपासणे व इतर अशी अनेक कार्ये पार पाडली जातात.
या सर्वांचा कालावधी केवळ तीन वर्षांकरिता असतो.तीन वर्षे पूर्ण झाली की नव्याने ग्रामसभेद्वारे अशासकीय पदाधिकारी यांची निवड केली जाते.निवड झाल्यानंतर प्रत्येक महिन्यातुन एकदा बैठक घेतली जाते.नियमित बैठका घेऊन बैठकीचा अहवाल तहसीलदार यांना पाठवावा लागतो.सर्व दक्षता समित्यांच्या बैठका वेळच्या वेळी घेतल्या जातात किंवा नाही याची खातरजमा जिल्हास्तरावरील अप्पर जिल्हाधिकारी यांनी करणे आवश्यक आहे.मात्र दक्षता समितीतील अशासकीय सदस्यांनी एकही बैठक वा भेटी रास्त भाव दुकानदारांना दिले गेले नसल्याचे निदर्शनास दिसून येते.
दक्षता समितीतील पदाधिकारी जोपर्यंत नामधारी असणार तोपर्यंत कोणत्याही समित्या स्थापन करून त्याचा काहीही उपयोग होणार नाही.त्यासाठी ज्यांच्याकडे वेळ व कुवत आहे अशांनाच समितीमध्ये व इतर ठिकाणी नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून केली जात आहे.