- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-आष्टी-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील चामोर्शी शहरात भीषण अपघात घडल्याची घटना आज,रविवार १८ मे रोजी दुपारच्या सुमारास चामोर्शी ग्रामीण रुग्णालयासमोर घडली. चौघेजण असलेल्या कारमधील तिघे जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला.अपघात इतका भीषण होता की, कार पूर्णपणे चकनाचुर झाली.अपघातात विनोद पुंजाराम काटवे वय ४५ वर्षे, राजू सदाशिव नैताम वय ४५ वर्षे व सुनील वैरागडे वय ५५ वर्षे या तिघांचा जागीच मृत्यू झाला असून तिघेही गडचिरोली येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. तर,अनिल मारोती सातपुते वय ५० वर्षे हे गंभीर जखमी झाले असून,त्यांना चामोर्शी ग्रामीण रुग्णालयातून गडचिरोली सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
माहितीनुसार,विनोद,राजू,सुनील व अनिल हे चौघेही आज रविवारी काही कामानिमित्त चामोर्शी शहरातून कार क्रमांक-एमएच ३३ ए ०८२५ ने आष्टीकडे जात होते.कारने जात असतांना चामोर्शी ग्रामीण रुग्णालयासमोर चालकाने अचानक वळण घेतला असता मागेहून येणाऱ्या मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिली.धडक बसताच कारचा चेंदामेंदा होऊन कारमधील तिघे जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला.घटना घडताच ट्रक चालक ट्रक तिथेच सोडून घटनास्थळावरून पसार झाला.पोलिसांना अपघात संदर्भात माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांकडून सध्या मालवाहू ट्रक चालकाचा शोध सुरू आहे.घटनेचा पुढील तपास चामोर्शी पोलीस करीत आहेत.घडलेल्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
- Advertisement -

