उद्रेक न्युज वृत्त :- आजपासून राज्यात महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा सुरू झाली आहे.मात्र,पहिल्याच दिवशी बोर्डाचा भोंगळ कारभार दिसून आला आहे.इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्नच छापून आला नाही तर त्या ऐवजी थेट उत्तर छापण्यात आले आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. प्रश्नपत्रिकेतील या घोळामुळे विद्यार्थ्यांना सहा गुणांची लॉटरी लागणार का?याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.तर, बोर्डाने या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे म्हटले आहे.
बारावी बोर्डाच्या इंग्रजी पेपर मध्ये तीन प्रश्नांमध्ये एका प्रश्नात उत्तर दिले आहे तर इतर दोन प्रश्नांमध्ये तपासणाऱ्याला सूचना दिल्यामुळे विद्यार्थ्यांना नेमके काय लिहायचं याबद्दल संभ्रम निर्माण झाल्याने आता बोर्डाला या संदर्भात स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. इंग्रजी पेपर मधील प्रश्न क्रमांक 3 इंग्रजी कवितेववर आधारित होता.प्रश्न क्रमांक 3 मधील उप प्रश्नात घोळ झाला असल्याचे समोर आले आहे.
A3 – 2 मार्कांसाठीचा प्रश्न ( यामध्ये प्रश्नाऐवजी उत्तर पत्रिका तपासणाऱ्याला सूचना दिली आहे.)
A4 – 2 मार्कांसाठी प्रश्न ( यामध्ये कवितेवर आधारित प्रश्नचे उत्तरच देण्यात आले.)
A5- 2 मार्क ( उत्तरपत्रिका तपासणाऱ्याला देण्यात येणाऱ्या सूचना देण्यात आल्या आहेत. )
या तिन्ही प्रश्नांमध्ये विद्यार्थ्यांनी नेमके करायचे काय हा प्रश्न दिलेला नाही.त्यामुळे विद्यार्थी हा प्रश्न सोडवण्यासंदर्भात संभ्रमात होते.अनेक शाळांमध्ये या संदर्भात सूचना सुद्धा देण्यात आल्याची माहिती आहे.
