उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- नागपुरातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.दुसऱ्या दिवशी होणाऱ्या पेपरचा अभ्यास झाला नसल्याच्या तणावातून विद्यार्थ्याची आत्महत्या केली.अभ्यास न झाल्यामुळे उद्याच्या पेपरमध्ये काय लिहिलणार; या टेन्शनमुळे एमसीएच्या विद्यार्थ्याने रेल्वेखाली उडी घेऊन आपले आयुष्य संपवले.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
ही घटना मानकापूर येथील गोधनी रेल्वेलाईनवर काल बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.यश माने अस मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो एमसीएचा विद्यार्थी होता. तो व्हीएमव्ही महाविद्यालयात एमसीएच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,यशचा बुधवारी सकाळी एमसीएचा पेपर होता.मात्र,रात्री बारा वाजताच्या सुमारास तो घरातून कुणालाही न सांगता निघून गेला.यश रात्री घरून निघून गेल्यावर कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला.मात्र तो कुठेही सापडला नसल्याने मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी नातेवाईक गेले असता रेल्वेखाली उडी मारून एका तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली.दुर्दैवाने तो तरुण यशच होता.यशचा मोठा भाऊ अतुल आयटी कंपनीत नोकरीला असून, वडील प्रकाश माने सुरक्षारक्षक आहेत.यशच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली असून,याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

