उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यातील धान खरेदीचा घोटाळा यापूर्वीच उजेडात आला आहे.आता यात आणखी एका प्रकरणाची भर पडली असून चामोर्शी तालुक्यातील पावीमुरांडा येथे धान खरेदीबाबत गैरप्रकार झाल्याचे उजेडात आले आहे.याप्रकरणी चामोर्शी पोलिस ठाण्यात चौघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
आर.आर.नैताम,आर एस.मडावी,तत्कालीन प्रभारी उपप्रादेशिक व्यवस्थापक व्ही.ए.कुंभार,तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक जी.आर.कोटलावार यांचा यात समावेश आहे.त्यांच्यावर भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम ३४,४०९,४२०,४६५,४६८,४७१ अन्वये चामोर्शी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाचे प्रभारी प्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर शंकर बावणे यांनी चामोर्शी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत २०२२-२३ या हंगामात चामोर्शी तालुक्यातील घोटच्या उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित खरेदी केंद्र पावीमुरांडा येथे धानाचा अपहार झाला.ही अपहाराची किंमत कोट्यवधी रूपयांच्या घरात असल्याने या प्रकरणात आता नेमकी कोणती कारवाई होते; याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ हा राज्य शासनाचा उपक्रम आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या शासन निर्णयान्वये केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत हंगाम २०२२-२३ करिता आदिवासी उपयोजना क्षेत्राकरिता महाराष्ट्र राज्य सहकारी
आदिवासी विकास महामंडळाची मुख्य अभिकर्ता म्हणून नेमणूक करण्यात आली.या योजनेअंतर्गत आदिवासी उपयोजना क्षेत्रातील शेतकरीवर्गाकडून हमीदराने धानाची खरेदी करण्यात येते.त्यानुसार चामोर्शी तालुक्यातील पावीमुरांडा येथील केंद्रावर धान खरेदी करण्यात आली.मात्र,यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करण्यात आला.यामध्ये आर.आर.नैताम, आर. एस.मडावी, तत्कालीन प्रभारी उपप्रादेशिक व्यवस्थापक व्ही.ए.कुंभार, तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक जी.आर.कोटलावार यांचा सहभाग असल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाचे प्रभारी प्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर शंकर बावणे यांनी चामोर्शी पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात धान खरेदीचा घोटाळा उजेडात आल्यानंतर याचे पडसाद सर्वत्र उमटले.मात्र याबाबत ठोस अशी कारवाई झाली नाही.शिवाय या प्रकरणातील बडे मासे मोकाट असल्याचे दिसून आले. या प्रकरणाचे प्रमुख केंद्रबिंदू असलेल्या आरमोरी, देसाईगंज या भागातील राजकीय पक्षाशी निगडित असलेले हे बडे मासे पोलिसांच्या गळाला केव्हा लागतील, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला.