- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात देशभक्तीचा जागर करत जिल्हा पोलीस मुख्यालयातर्फे आज शनिवारी तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.या रॅलीचे उद्घाटन सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले.विशेष म्हणजे, उद्घाटनानंतर सहपालकमंत्री ॲड.जयस्वाल यांनी स्वतः मोटरसायकलवर स्वार होत तिरंगा बाईक रॅलीत सहभाग नोंदविला.
भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि तिरंग्याप्रती अभिमानाची भावना अधिक दृढ व्हावी,या उद्देशाने जिल्हा पोलीस मुख्यालयातर्फे या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
रॅलीच्या प्रारंभी सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल, आमदार डॉ.मिलिंद नरोटे,जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा,जिल्हा पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी हिरवी झेंडी दाखवून तिरंगा बाईक रॅलीचा शुभारंभ केला. त्यानंतर त्यांनी स्वतः मोटरसायकलवर स्वार होऊन रॅलीत सहभाग घेतला.सहपालकमंत्र्यांच्या या सहभागामुळे उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्साह आणखी वाढला.या तिरंगा बाईक रॅलीत सहपालकमंत्री यांच्यासह आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश तसेच जिल्हा पोलीस दलातील सुमारे ३०० हून अधिक अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
तिरंगा हाती घेतलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मोटरसायकलींची रांग आणि त्यात सहभागी झालेले लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी यामुळे संपूर्ण रॅली देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेली.स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय एकात्मता, देशाप्रती कर्तव्यभावना आणि तिरंग्याचा सन्मान यांचा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला.
पोलीस दल कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच विविध राष्ट्रीय व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृतीचे कार्यही करत असते. स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित या तिरंगा बाईक रॅलीत लोकप्रतिनिधी,प्रशासन आणि पोलीस दलाने एकत्रित सहभाग नोंदवत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.
- Advertisement -

