- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्ह्यात “मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६” प्रभावी व पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत आहे.या कार्यक्रमाच्या अंमलबजावणी संदर्भात जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज, सोमवार २९ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन कार्यक्रमाचा आराखडा,कार्यपद्धती आणि वेळापत्रकाची सविस्तर माहिती दिली.यावेळी उपजिल्हाधिकारी(निवडणूक) राहुल जाधव तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.बैठकीत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सांगितले की,भारत निवडणूक आयोगाच्या १४ मे २०२६ रोजीच्या निर्देशानुसार राज्यभर विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून १ ऑक्टोबर २०२६ ही मतदार नोंदणीसाठी अर्हता दिनांक निश्चित करण्यात आली आहे.या दिनांकापर्यंत १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व पात्र नागरिकांना मतदार म्हणून नोंदणीची संधी उपलब्ध होणार आहे.
जिल्ह्यात २० ते २९ जून या कालावधीत आवश्यक तयारी,कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण तसेच एन्ल्युमरेशन फॉर्मची छपाई पूर्ण करण्यात आली असून ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ)घरोघरी भेट देऊन एन्ल्युमरेशन फॉर्म भरून घेणार आहेत.संबंधित माहिती बीएलओ ॲपद्वारे ऑनलाईन नोंदविण्यात येणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील ६७-आरमोरी (अ.ज.),६८-गडचिरोली (अ.ज.)आणि ६९-अहेरी(अ.ज.)या तीन विधानसभा मतदारसंघांतील एकूण ८ लाख २८ हजार ९०४ मतदारांच्या पडताळणीसाठी १६ लाख ५७ हजार ८०८ एन्ल्युमरेशन फॉर्म छापण्यात आले असून त्यांचे वितरण सुरू आहे.
जिल्ह्यात एकूण ९१.४८ टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून १ लाख ३९ हजार ८११ मतदारांच्या नोंदींमध्ये विविध प्रकारच्या त्रुटी आढळल्या आहेत.या सर्व मतदारांकडून बीएलओ घरोघरी जाऊन आवश्यक माहिती व अर्ज संकलित करतील.त्याआधारे ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.तसेच दुबार नावे पडताळून आवश्यक ती कार्यवाही मतदार नोंदणी अधिकारी स्तरावर करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील ९७२ मतदान केंद्रांसाठी २ हजार ७९६ बूथ लेव्हल एजंट(बीएलए)नियुक्त केले असून,त्यांनी बीएलओंना सहकार्य करून मतदार याद्या अधिक अचूक व त्रुटीमुक्त करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा,असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.
- महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे👇
३० जून ते २९ जुलै २०२६ : घरोघरी भेटी व एन्ल्युमरेशन फॉर्म संकलन.
२९ जुलै २०२६ : मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण पूर्ण.
५ ऑगस्ट २०२६ : प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध.
५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ : दावे व हरकती स्वीकारणे.
७ ऑक्टोबर २०२६ : अंतिम मतदार यादी प्रसिद्ध.
यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती देत मतदार जनजागृतीमध्ये सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करून घेण्याचे तसेच बीएलओ घरी भेट देईल त्यावेळी आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.ज्या मतदारांच्या तपशिलामध्ये तफावत आढळेल,त्यांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून नोटीस देण्यात येईल.जन्म प्रमाणपत्र,दहावीचे प्रमाणपत्र,वैध शासकीय ओळखपत्र,कायम निवास प्रमाणपत्र,वनहक्क प्रमाणपत्र किंवा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र यांसारखी आवश्यक कागदपत्रे सादर करता येतील.
- Advertisement -

