- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
प्रशांत गेडाम
सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही तालुक्यातील पवनाचक गावातील मजुरांवर तेलंगणा राज्यातील रामगुंडम परिसरात काळाने घाला घातल्याने चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला,तर तब्बल २७ मजूर गंभीर जखमी झालेत.या दुर्घटनेमुळे पवनाचक गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील पवनाचक गावातील मजूर स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध नसल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही भात रोवणीच्या हंगामी कामासाठी तेलंगणा राज्यात गेले होते.सलग तीन दिवस त्यांनी शेतात भात रोवणीचे काम केले.काल गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शेतातील कामे आटोपून ते राहत्या ठिकाणी परत जात असतांना रामगुंडम परिसरात त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला.अपघाताची भीषणता इतकी जोरदार होती की घटनास्थळीच चार मजुरांचा मृत्यू झाला,तर अनेकजण गंभीर जखमी झाले.या दुर्घटनेत अतुल वासुदेव सोनुले वय ४५ वर्षे,रा.पवनाचक, ता.सिंदेवाही,जि.चंद्रपूर,अर्चना जनार्धन सोनुले वय ४० वर्षे,रा.पवना चक,ता.सिंदेवाही, रंजना प्रभाकर शेंडे वय ५० वर्षे,रा.पवना चक, ता.सिंदेवाही आणि प्रभा सिताराम मोहुर्ले वय ५६ वर्षे,रा.वाढोना,ता. नागभीड,जि.चंद्रपूर अशी मृतांची नावे आहेत.तर जखमी २७ मजुरांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून,काहींची प्रकृती चिंताजनक आहे.या दुर्घटनेतील सर्वाधिक हृदयद्रावक बाब म्हणजे अर्चना जनार्धन सोनूले आणि प्रभा सीताराम मोहुर्ले या मायलेकींचा एकाच अपघातात मृत्यू झाला.या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे.
ग्रामीण भागात पुरेसा रोजगार उपलब्ध नसल्याने अनेक कष्टकरी मजुरांना उदरनिर्वाहासाठी परराज्यात जावे लागते.मात्र,प्रवासात होणारे अपघात अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत.भाकरीच्या शोधात घरापासून दूर गेलेल्या मजुरांचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू होणे ही अत्यंत वेदनादायी बाब असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.सिंदेवाही तालुक्यात यापूर्वी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांतही अनेकांनी जीव गमावला आहे.आता रोजगारासाठी परराज्यात गेलेल्या मजुरांच्या अपघाती मृत्यूने ग्रामीण भागातील रोजगार,सुरक्षित प्रवास आणि मजुरांच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शासनाने ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला प्राधान्य देऊन अशा दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
- Advertisement -

