उद्रेक न्युज वृत्त :- मागील काही दिवसांपासून विजेच्या स्मार्ट मीटरविरोधात सुरू असलेल्या जनआक्रोशाची दखल राज्य सरकारने घेतली आहे.घरगुती वापरासाठी स्मार्ट मीटर लागू केले जाणार नाहीत; त्यासाठी पूर्वीचीच पद्धत कायम राहील; असे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल,शुक्रवारी जाहीर केले.
मुंबईत शुक्रवारी भाजपच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.त्यात फडणवीस यांनी सामान्य वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाही; असे स्पष्ट केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली.त्यामुळे आता घरगुती आणि लहान व्यावसायिकांसाठी स्मार्ट मीटर न लावता ते केवळ औद्योगिक आणि मोठ्या वीज ग्राहकांसाठी ते लावले जातील,असे स्पष्ट झाले.
स्मार्ट मीटरचे कंत्राट अदानी पॉवर,जीनस कंपनी, एनसीसी कंपनी,मॉन्टेकालों या कंपन्यांना देण्यात आले होते.येत्या आठवड्यापासून ते बसविण्यास सुरुवात होणार होती.आता मात्र फडणवीस यांच्या घोषणेमुळे सामान्य वीज ग्राहकांकरीता स्मार्ट मीटर आणली जाणार नाहीत; हेही स्पष्ट झाले आहे.

