उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-सायबर गुन्हेगारीचा व्हायरस दिवसेंदिवस वाढतच असून,कर्जाच्या नावाखाली नागरिकांना जाळ्यात ओढण्याचेदेखील प्रयत्न सुरू असतात. विशेषतः कर्ज देण्याची बतावणी करणाऱ्या बोगस संकेतस्थळाच्या माध्यमातून नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घालण्यात आला आहे.केंद्रीय यंत्रणांनी आठ महिन्यांतच अशा ३७९ बोगस संकेतस्थळांना बंद केले आहे.मात्र,तरीदेखील समस्या संपली नसून दररोज नवी संकेतस्थळे उघडण्यात येत असून,हे तपास यंत्रणांसमोरील मोठे आव्हानच आहे.
सायबर गुन्हेगारांकडून कर्ज देणाऱ्या बोगस संकेतस्थळांच्या माध्यमातून नागरिकांना संपर्क करण्यात येतो.कमी दरात कर्ज देण्याचे आमिष दाखवत त्यांना जाळ्यात ओढण्यात येते व संकेतस्थळांची लिंक पाठविली जाते.त्यावर नागरिकांकडून वैयक्तिक माहिती,बँक खात्याचे तपशील भरल्यानंतर त्याचा उपयोग करून सायबर गुन्हेगार त्यांना गंडा घालतात.या मोडस ऑपरेंडीच्या माध्यमातून आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा चुना लावण्यात आला आहे.सायबर गुन्ह्यांच्या तपासासंदर्भात केंद्र शासनाने ‘आयफोरसी’ची (इंडियन सायबर क्राइम को-ऑर्डिनेशन सेंटर) स्थापना केली आहे.नॅशनल क्राइम रेकॉर्ड पोर्टलवर ५ हजार २५२ संशयित ‘यूआरएल’ संदर्भात तक्रारी आल्या होत्या.त्यात कर्ज देण्याचा दावा करणाऱ्या बोगस संकेतस्थळांचादेखील समावेश होता.’आयफोरसी’ने ‘नॅशनल इंटरनेट एक्स्चेंज ऑफ इंडिया’च्या सहकार्याने त्यातील ३७९ संकेतस्थळे बंद केली आहे.ऑक्टोबर २०२३ ते मे २०२४ या कालावधीत ही कारवाई करण्यात आली आहे.
सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक केल्यानंतर संबंधित पैसे विविध बँक खात्यात झपाट्याने वळविण्यात येतात.मात्र,सायबर सेल्सना आता ‘मनी ट्रेल’च्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. ‘आयफोरसी’च्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या ‘सिझिटन्स सायबर फ्रॉड रिपोटिंग अँड मॅनेजमेंट’ या प्रणालीत तब्बल ७.६ लाख तक्रारी आल्या आहेत. यातून सायबर गुन्ह्यांची दाहकता समोर येते.या प्रणालीमुळे आतापर्यंत पीडितांचे चोवीसशे कोटी रुपये वाचविण्यात यश आले आहे.

