उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-शहीद सप्ताहादरम्यान नक्षल्यांनी भामरागड तालुक्यातील मिळगुडवंचा या दुर्गम गावातील लालू मालू धुर्वा या ४० वर्षीय इसमाची पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून हत्या केली असल्याची घटना आज,दिनांक-३१ जुलै पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.
मंगळवारी रात्री सशस्त्र नक्षल्यांनी लालू धुर्वा यास झोपेतून उठवून बाहेर नेले आणि त्यानंतर त्याची हत्या केली.नक्षल्यांनी मृतदेहाजवळ एक चिठ्ठी टाकली. लालू हा पोलिसांचा खबऱ्या होता.त्याच्या माहितीवरून एकदा आम्हाला कॅम्प सोडून पळावे लागले.त्यामुळे संधी मिळताच त्याची हत्या केली; असे नक्षल्यांनी चिठ्ठीत लिहिले आहे.त्यावर पीपल्स लिबरेशन गुर्रीला आर्मी असा उल्लेख आहे.
२८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत नक्षलवादी शहीद सप्ताह साजरा करतात.२५ जुलै रोजी भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथे जयराम कोमटी गावडे याची नक्षलवाद्यांनी बंदुकीच्या गोळीने हत्या केली होती.त्यानंतर ही दुसरी हत्या आहे.

