- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक आपल्या न्याय हक्काचा लढा नेहमी लढतांना दिसून येतात.ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत शेतकरी साहित्यातील त्रुटी असोत वा पतसंस्थेतील ठेविंबाबत झालेला अन्याय असो किंवा इतर अन्यायाविरोधात आवाज उठवत असतात.अश्याच प्रकारे यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यातील शंकरनगर येथील सीमा अनिल क्षीरसागर यांनी दाखल केलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या प्रकरणात यवतमाळ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष डॉ.रवींद्र उल्हास मराठे व सदस्य अनिल तोष्णीवाल यांनी वीज वितरण कंपनीला जोरदार दणका देत पाच लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.
- काय आहे प्रकरण?👇
शंकरनगर येथील सीमा क्षीरसागर यांच्या शेतात सागवानाची मोठी ५०० झाडे होती.अश्यातच वीज वितरण कंपनीकडून क्षीरसागर यांच्या शेतातून शेजारच्या शेतात वीजपुरवठा देण्यात आला होता. यासाठी विद्युत खांबावरील ओढण्यात आलेल्या तारा ढील्या राहिल्याने तारांमध्ये वारंवार घर्षण होण्याचे प्रकार घडत राहिले. याबाबत सीमा क्षीरसागर यांनी वीज कंपनीला सांगूनही लक्ष दिले नाही.जराही हवाधून आली तरी तारांमध्ये घर्षणाचे प्रकार होत होते.दरम्यान,५ एप्रिल २०२२ रोजी वादळामुळे तारांमध्ये घर्षण होऊन आगीच्या ठिणग्या खाली पडल्या आणि शेतात सागवानाची पाने पडून असल्याने आग भडकली.यात वीज तारांमधील घर्षणातून पडलेल्या ठिणगीमुळे तब्बल ७ लाख रुपये किंमतीचा सागवान जळून खाक झाला.सदरचे नुकसान हे विद्युत वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे घडल्याने सीमा क्षीरसागर यांनी वीज कंपनीकडे नुकसानभरपाई मिळावी याकरिता पत्रव्यवहार केला.मात्र,वीज वितरण कंपनीने हलक्यात घेऊन कुठलाही प्रतिसाद दिला नाही.परिणामी,सीमा क्षीरसागर यांनी यवतमाळ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात दाद मागितली.प्रकरणी काल शुक्रवारी वीज वितरण कंपनीविरोधात निर्णय देण्यात आला.वीज तारांची योग्य देखभाल केली नसल्याने शेतातील सागवानाचे नुकसान झाल्याची बाब सिद्ध करण्यात तक्रारकर्ते यशस्वी ठरल्याने आयोगाने वीज वितरण कंपनीला सीमा क्षीरसागर यांना पाच लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.प्रकरणातील विशेष बाब म्हणजे,वीज कंपनीने घडलेल्या घटनेला नैसर्गिक आपत्ती म्हणून नुकसानभरपाई देण्याचे टाळले होते.मात्र,तक्रारकर्त्यांनी आयोगात मांडलेली कणखर बाजू महत्वाची ठरली आणि ग्राहक आयोगाने वीज कंपनीच्या निष्काळजीपणामुळेच सदरचा प्रकार घडल्याचा निर्वाळा दिला.
- Advertisement -

