- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-आगामी काळात संभाव्य एल निनो परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व जलसंधारण व पाणी साठवण क्षमता वाढविणाऱ्या योजनांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जलयुक्त शिवार अभियान २.०,प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना(PMKSY)२.० तसेच गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार अभियानाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
बैठकीत जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध जलसंधारण योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत विशेष निधी व अभिसरणातून एकूण ६ हजार ५१६ कामे प्रस्तावित करण्यात आली असून त्यापैकी ५ हजार १३४ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.आतापर्यंत ४ हजार ६८० कामे पूर्ण झाली असून अभियानाची एकूण प्रगती ९१ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.विशेष निधीतील ९७ टक्के तर अभिसरणातील ८७ टक्के कामे पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी अमित राऊत यांनी बैठकीत दिली.
जिल्हाधिकाऱ्यांनी प्रगतीपथावरील उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्यावर भर देत संबंधित विभागांनी आवश्यक समन्वय साधावा,असे निर्देश दिले.पूर्ण झालेल्या सर्व कामांचे भू-अंकन(जिओ टॅगिंग)वेळेत पूर्ण करून त्याची माहिती अद्ययावत ठेवण्याचेही त्यांनी सांगितले.सध्या अभियानांतर्गत पूर्ण झालेल्या कामांपैकी सुमारे ३० टक्के कामांचे जिओ टॅगिंग पूर्ण झाले असून उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना(PMKSY)२.० अंतर्गत जिल्ह्यातील चार प्रकल्पांमध्ये एकूण १ हजार १२८ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्यापैकी १ हजार २९ कामे पूर्ण झाली आहेत. योजनेची एकूण भौतिक प्रगती ८५ टक्क्यांहून अधिक असल्याची माहिती बैठकीत सादर करण्यात आली. याशिवाय प्रलंबित प्रशासकीय मान्यता प्रस्ताव आणि रद्द करावयाच्या कामांचाही आढावा घेण्यात आला.
गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील तलाव व नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे विविध संस्थांमार्फत राबविण्यात येत आहेत.या अभियानात आतापर्यंत सुमारे ७.५४ लाख घनमीटर गाळ काढण्यात आला असून २९ कामे पूर्ण झाली आहेत.प्रगतीपथावरील व सुरू न झालेल्या कामांबाबत संबंधित संस्थांनी तातडीने कार्यवाही करून निर्धारित कालमर्यादेत कामे पूर्ण करावीत,असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
बैठकीत जिल्ह्यातील जलसंधारणाच्या विविध योजनांच्या माध्यमातून भूजल पातळी वाढविणे,पाणी उपलब्धता सुधारणा,मृदसंधारण आणि सिंचन क्षमता वाढविणे यासाठी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला.संभाव्य एल निनोमुळे पर्जन्यमानावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन जलस्रोतांचे संवर्धन आणि उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी सर्व यंत्रणांनी अधिक प्रभावीपणे काम करावे,असेही जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी स्पष्ट केले.
बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,मृद व जलसंधारण विभागाचे अधिकारी,जलसंपदा विभाग, जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभाग,भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा,वन विभाग तसेच विविध तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
- Advertisement -

