- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत संजय गांधी निराधार विभागात कार्यरत आय.टी.असिस्टंट (संगणक चालक)यांनी मानधनवाढ व इतर मागण्यासंदर्भात शासनास वेळोवेळी निवेदने,आंदोलने व पत्रव्यवहार करूनही शासन ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने अखेर उद्या,शनिवार २८ जून पासून बेमुदत संप पुकारून मुंबईच्या आझाद मैदानावर राज्यातील सर्व ४१९ संगणक चालकांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.विशेष म्हणजे, महागाईच्या काळात संगणक चालकांना १९ डिसेंबर २०१३ च्या शासन निर्णयानुसार ५ हजार ५०० रुपये,८ मार्च २०२३ च्या शासन निर्णयानुसार ८ हजार ८१० रुपये तर ७ सप्टेंबर २०२१ पासून आजपर्यंत ११ हजार ५१४ रुपये इतक्या तुटपुंज्या मानधनावर शासनाकडून विविध कामे करवून घेण्यात येत आहेत.त्यामुळे कामगार विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे किमान वेतन धोरणानुसार ३२ हजार रुपये मानधन देण्याची मागणी संगणक चालकांकडून करण्यात येत आहे.
संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर विशेष सहाय्य योजनांसाठी राज्यातील आयुक्त कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालये व तहसिल कार्यालय या सर्व कार्यालयांत स्मार्ट सर्व्हिसेस प्रा.लि.(ब्रिक्स इंडिया प्रा.लि.पुणे)यांच्या मार्फतीने बाह्यस्त्रोतांव्दारे(आऊट सोर्सिंग)आय.टी.असिस्टंट(संगणक चालक) म्हणून शासनास मणुष्यबळ पुरवठा करण्यात आला आहे. त्यानुसार संजय गांधी निराधार योजनेच्या विभागात जानेवारी २०१४ पासुन राज्यात ४१९ आयटी असिस्टंट(संगणक चालक)या पदावर कार्यरत आहेत.कार्यरत सर्व आयटी असिस्टंट शासन व कार्यालयीन मार्गदर्शनाखाली विभागासंबंधित सर्व कामे प्रामाणीकपणे पार पाडत आहेत.अश्यातच सद्यस्थितीमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये मानधन कमी असतांना देखील आय.टी.असिस्टंट (संगणक चालक) हे मयत लाभार्थींची नावे कमी करणे,नवे लाभार्थी अद्यावत करणे,डीबीटी पोर्टल व NSAP आणि PFMS प्रणालीव्दारे संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेची कामे प्रामाणिकपणे पार पाडीत आहेत.याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगीतलेली इतर कार्यालयीन कामेसुध्दा व्यवस्थितरित्या पार पाडत आहेत.त्यामुळे लाभार्थ्यांना वेळोवेळी त्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होत असते.त्यातच संगणक चालकांना मिळणारे मासिक मानधन तुटपुंजे असतांनाही वेळेवर मिळत नाही. त्यामुळे अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे.महागाईच्या काळात संसाराचा गाडा हाकणे कठीण झाले आहे.मागील सात ते आठ वर्षांपासून मानधनवाढीबाबत जिल्हाधिकारी तथा इतर प्रतिनिधी यांच्या मार्फतीने निवेदने पाठविण्यात आलेत.परंतु आजपर्यंत कुठल्याही प्रकारची मानधनात वाढ करून देण्यात आली नाही.अश्यातच सद्यास्थितीत ६ महिण्यांसाठी कार्यरत युवा प्रशिक्षणार्थी यांचे मासिक मानधन १० हजार रुपये असून गेल्या ११ वर्षांपासून संजय गांधी निराधार योजना अश्या महत्वाच्या योजनेत आय.टी.असिस्टंट काम करीत असुनही कंपनीकडून केवळ ११,५१४ रुपये मासिक मानधन मिळत आहे.त्यातच इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे.मात्र,संगणक चालकांच्या मानधनात अजूनही वाढ करण्यात आली नसल्याने तुटपुंज्या मानधनात स्वतः व कुटुंबियांचे भरणपोषण करणे अशक्य झाले आहे.त्यातच १७ जून २०२५ ला आय.टी.असिस्टंट यांचे मानधनवाढीबाबत मागण्यांचे पत्र शासनास पाठविण्यात आले होते.परंतु दिलेल्या मागण्यांवर कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आली नसल्याने उद्यापासून मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत संप पुकारून तिव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे संगणक चालकांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
- Advertisement -

