उद्रेक न्युज वृत्त
चामोर्शी(गडचिरोली) :- गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी वनक्षेत्रात मागील काही महिन्यांपासून वाघाची प्रचंड दहशत पसरली आहे.दिनांक -२ मे रोजी वाघाने वेलतूर तुकूम येथे बोकड ठार केल्याची घटना घडली होती.या घटनेनंतर एक महिन्याच्या कालावधीतच रविवारी,२ जून रोजी वाघाने याच परिसरातील नदी काठावरील शेतशिवारात हल्ला चढवित बोकड ठार केल्याची घटना घडली.महिनाभरात वाघाने दोन बोकड ठार केल्याने,या परिसरातील नागरिक प्रचंड दहशतीत आहेत.चामोर्शी वनक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या वेलतूर तुकूम येथील सोमनाथ परशूराम मंगल या शेतकऱ्यांच्या शेळ्या रविवारी वैनगंगा नदी काठालगतच्या शेतशिवारात चराईसाठी गेल्या होत्या. दरम्यान वाघाने यातील एका बोकडावर हल्ला चढवून ठार केले.यात त्यांचे १८ हजाराचे नुकसान झाले. घटनेची माहिती प्राप्त होताच वनपरिक्षेत्राधिकारी आर.बी.इनवते यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक गोवर्धन,वनरक्षक ए.एस. नैताम,पोलिस पाटील मुकुंदा सरकार,उपसरपंच दिंगाबर धानोरकर आदींनी घटनास्थळ गाठित पंचनामा केला.दरम्यान वनरक्षक नैताम यांनी काल,सोमवारी,दिनांक -३ जून रोजी घटनास्थळालगत लावलेल्या ट्रॅप कमेऱ्याची पाहणी केली असता; ट्रॅप कॅमेऱ्यात वाघ कैद झाला.

