- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-अवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार असल्याने इच्छुकांची भाऊगर्दी मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.अशातच आता सर्वसामान्यांना महागाईची चिंता,तर इच्छुकांना आपले नाव यादीत केव्हा येईल याची चिंता सतावू लागली आहे.दुसरीकडे इच्छुकांची संख्या प्रत्येक पक्षात वाढलेली पाहायला मिळत आहे.एकंदर आतापासूनच इच्छुक विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात गुडघ्याला बार्शिंग बांधून बसल्याचे पाहावयास मिळत आहेत.
सध्या सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत.प्रत्येक पक्षात इच्छुकांची संख्या फुगलेली दिसत आहे.उमेदवारीसाठी इच्छुक जिवाचा आटापिटाही करीत आहेत.काही इच्छुकांनी लोकसभा निवडणुकीपासूनच मतदारसंघातील गावांचे दौरे सुरू केले आहेत. मतदारसंघात मतदारांच्या गाठीभेटी घेणे,त्यांचे प्रश्न सोडविणे,त्यांच्या समस्या जाणून घेणे,आदी कामे ते नेटाने करू लागले आहेत.काही इच्छुक तर उमेदवारी मिळो अथवा न मिळो,आपण निवडणूक लढणारच,असे ठामपणे सांगताना दिसून येत आहेत.त्यादृष्टीने त्यांनी भेटीगाठींवर भरही दिला आहे.
कोणत्याही राजकीय पक्षाने आपले उमेदवार जाहीर न केल्यामुळे इच्छुक व मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.ऐनवेळी उमेदवारी न मिळालेले इच्छुक बंडखोरी करण्याची शक्यता आहे.विधानसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बंडखोरांचे पीक प्रत्येक पक्षात पाहावयास मिळणार आहे.उमेदवारी न मिळालेले इच्छुक पक्षनिष्ठा पाळतात की आपली वेगळी चूल मांडतात,हे येणारा काळच सांगणार आहे.
विधानसभेच्या तिकिटासाठी राजकीय पक्षात रस्सीखेच सुरू असून,उमेदवार निवडण्यामध्ये पक्षश्रेष्ठींची कसोटी लागणार आहे.आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता राजकीय वातावरण तापले आहे.महायुती व महाविकास आघाडी उमेदवार निवडताना दक्षता घेत आहेत.सध्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये पुढाकार घेत आहेत.काहीजण तर निवडणुका आल्या की घराबाहेर आपल्याला पक्षाची उमेदवारी जाहीर होईल,असे इच्छुक आपल्या कार्यकर्त्यांना सांगत आहेत.महायुती व महाविकास आघाडीमध्ये तिकिटासाठी इच्छुकांमध्ये चढाओढ असल्याने सर्वसमावेशक उमेदवाराची निवड करणे पक्ष श्रेष्ठींसाठी कसोटी ठरण्याची चिन्हे आहेत.
तोडीस तोड असणारा उमेदवार पक्षश्रेष्ठी शोधत आहेत.उमेदवारीसाठी मुंबईच्या चकरा वाढलेल्या आहेत.सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार निवडीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत.तसेच मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचीही मते जाणून घेतली जात आहेत.आता फक्त उमेदवारी जाहीर होणे बाकी आहे.विधानसभा मतदा- रसंघात अनेक प्रश्न आहेत; हे प्रश्न आपणच सोडवू शकतो असे इच्छुक मतदारांना सांगत आहेत.
- Advertisement -

