- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-आता सरकारला काय म्हणावे? विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने महिलांसाठी “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना” सुरू केली.लाखो महिलांनी अर्ज करून लाभ घेतला. त्यातील काही महिला शासकीय कर्मचारी निघाल्या,तर काही पुरुषांनी लाभ घेतल्याचे उघड झाले.पुरुषांनी लाभ घेतला म्हणजे काही महिलांकडे बँकेचे खाते नसल्याने कुटुंबातील व्यक्तीचे बँक खाते जोडले.यामुळे खळबळ उडाली होती.मात्र,आता सरकारने दोन महिन्यात ई-केवायसी करण्याची अट घातल्याने लाडक्या बहिणींची डोकेदुखी वाढली आहे.वेबसाइटच्या तांत्रिक अडचणीमुळे खेळ-खंडोबा झाला आहे.ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करतांना ग्रामीण भागातील महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.ई-केवायसीसाठी आवश्यक असलेली वेबसाईट व्यवस्थित चालत नसल्याने ग्रामीण भागातील महिलांना वारंवार इकडे-तिकडे चकरा माराव्या लागत आहेत,यामुळे वेळ आणि पैसा वाया जात आहे.ई-केवायसी करवून सरकार काय साध्य करू पाहते,हेच कळेनासे झाले आहे.महत्वाचे म्हणजे,सरकारने काही लाभार्थ्यांचे लाभ बंद केले आहे. त्यांची पडताळणी केली जाणार म्हणून गाजावाजा सुरू आहे.मात्र,प्रत्यक्षात पडताळणीच बंद असल्याची माहिती मिळाली आहे.ग्रामीण भागातील एका अंगणवाडी सेविकेला ज्यांचे लाभ बंद करण्यात आलेले आहेत, अश्यांबद्दल विचारणा केली असता आम्हाला कुठल्याही प्रकारची सूचना वा काय करायचे म्हणून सांगितले नसल्याची माहिती दिली.योजनेतील बोगस लाभार्थी थांबविण्यासाठी सरकारने ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक केली आहे.या प्रक्रियेमुळे कागदपत्रांची अचूक छाननी होऊन केवळ पात्र महिलांनाच लाभ मिळेल,अशी सरकारची अपेक्षा आहे.मात्र,लाडकी बहीण योजनेची वेबसाईट वारंवार हँग होणे,त्याचे सर्वर डाऊन असणे अशा समस्यांमुळे त्यांची नोंदणी पूर्ण होत नाही. कागदपत्रे सादर करूनही केवळ तांत्रिक बिघाडामुळे नोंदणी होत नसल्याने महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.या तांत्रिक अडचणींमुळे अनेक पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यासाठी नवी शक्कलच म्हणावे लागेल.कारण,ज्या महिलांना लाभ मिळत आहे,अश्यांचे बँकेशी आधार लिंक असून डीबीटीद्वारे खात्यावर पैसे जमा होत आहेत.तरीही ई-केवायसी करा,ही भानगड कश्याला? योजनेमुळे डोकेदुखी असेल तर योजनाच बंद करा ना आणि निवडणुका आल्या की योजना सुरू करा.गोर गरीबांचा “आनंदाचा शीधा” मिळेनासा झालाय,आता पुढील नंबर कोणत्या योजनेचा हे सरकारलाच माहीत.
- ई-केवायसी प्रक्रिया👇
ई-केवायसी करण्यासाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाईट वर जावे.
वरील साईटवर गेल्यानंतर महिलांनी प्रथम आपला आधार क्रमांक टाकावा.
आधार क्रमांकानंतर खाली दिलेला कॅप्चा टाकावा. त्यानंतर खालील सूचना वाचून ओके बटनावर क्लिक करावे.
त्यानंतर आलेला ६ अंकी कोड प्रविष्ट करावा.
सदरचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर महिलांना त्यांच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकावा लागेल.
आधार क्रमांकानंतर खाली दिलेला कॅप्चा टाकावा. त्यानंतर खालील सूचना वाचून ओकेच्या बटनावर क्लिक करावे.
त्यानंतर आलेला ६ अंकी कोड प्रविष्ट करावा.
अखेरच्या टप्प्यात कुटुंब प्रमुखाला १)माझ्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीस नाही किंवा निवृत्तीवेतनाचा लाभ घेत नाही,२) माझ्या कुटुंबातील एक विवाहित व एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे या प्रश्नांची होय किंवा नाही अशा स्वरुपात उत्तरे द्यावी लागतील.त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करावे.अशा प्रकारे तुमची ई-केवायसी पूर्ण होईल.
- Advertisement -

