उद्रेक न्युज वृत्त :- अठरा वर्षे वयोगटाखालील मुले-मुली दुचाकी चालविताना आढळल्यास २५ हजार रुपये दंडासह २५ वर्षे वय होईपर्यंत वाहन चालविण्याचा परवाना देऊ नये; असे आदेश राज्य परिवहन आयुक्तांनी काढले.त्यासंबंधित त्यांनी सर्व उप प्रादेशिक कार्यालयांना सूचना दिल्या आहेत.त्यामुळे आता सुसाट तरुण आणि तरुणींनी वेळीच सुधारण्याची गरज आहे.
मोटर वाहन कायद्यातील (२०१९) तरतुदींनुसार राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी आदेश काढले आहे.त्यात अल्पवयीन मुले दुचाकी चालविताना आढळल्यास त्या मुलाचे पालक किंवा गाडी मालकास तीन वर्षे कैद २५ हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याची तरतूद आहे.अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी दुचाकी चालवित असल्याचे निदर्शनास आले तर वयाची २५ वर्षे पूर्ण करेपर्यंत त्यांना वाहन परवाना देऊ नये; असेही आदेशात बजावले आहे.या तरतुदींची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचनादेखील त्यांनी दिल्या आहेत.
दुचाकी चालविण्याचा परवाना वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यानंतरच दिला जातो.परंतु अल्पवयीन असताना ५० सीसीपेक्षा जास्त सीसीचे वाहन चालविताना आढळल्यास वयाच्या २५ वर्षांपर्यंत वाहन चालकाचा परवाना देण्यात येणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे.

