उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
गडचिरोली :- संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील सर्व लाभार्थ्यांना देण्यात येत असलेल्या १००० रुपये इतक्या मासिक अर्थसहाय्यात ५०० रुपये इतकी वाढ करुन अर्थसहाय्याची रक्कम दरमहा १५०० रुपये दिनांक- ५ जुलै २०२३ पासून लागू करण्यात आली आहे.
सदर अर्थसहाय्यात वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना,श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेतील सर्व लाभार्थ्यांना लागू करण्यात आली आहे.त्यानुसार १ अपत्य किंवा २ अपत्य असलेल्या विधवा लाभार्थ्यांना देखील अर्थसहाय्याची रक्कम दरमहा १५०० रुपये इतकी राहील.तसेच दिनांक २० ऑगस्ट,२०१९ च्या शासन निर्णयातील लाभार्थ्याच्या मुलाची २५ वर्ष वयाबाबतची अट रद्द करण्यात आली आहे.
हयात प्रमाणपत्राच्या तरतूदीमध्ये बदल करण्यात आला असून लाभार्थ्यांनी त्याच आर्थिक वर्षात हयात प्रमाणपत्र सादर केल्यास लाभार्थ्याचे बंद केलेले अर्थसहाय्याचे वाटप पूर्ववत करण्यात येणार आहे.
तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्याच्या मुलाला नोकरी मिळाल्यानंतर (यामध्ये – शासकीय,निमशासकीय व खाजगी नोकरीचा समावेश)मुलाचे व कुटूंबाचे उत्पन्न विचारात घेऊन लाभार्थ्याची पात्रता ठरविण्यात येणार आहे.