उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- दरवर्षी मार्च महिना आला की उष्णतेचे चटके जाणवू लागतात.बाहेर ठिकाणी जाणारे नागरिक,प्रवाशी,अधिकारी,कर्मचारी व सर्वसामान्य जनता उन्हाच्या तडाख्यामुळे बाटलीबंद पाणी पिण्याचा सर्वात जास्त वापर करतांना दिसून येतात.
त्यामुळे बाटलीबंद पाण्याला उन्हाळ्यात सर्वात जास्त पसंती दर्शवून मागणी वाढलेली दिसून येते.
परिणामी बाटलीबंद व्यवसाय तेजीत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.असे असले तरी शुद्ध पाण्याच्या नावाखाली केवळ पाणी थंड करून विकण्याचा सपाटा काही व्यावसायिकांनी सुरू केला आहे.पाणी शुद्ध केले जाते की नाही,कमी कालावधीत बक्कळ पैसा कमविण्याच्या हव्यासापोटी बाटलीबंद परंतु अशुद्ध पाणीपुरवठा करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळले जात असल्याने बाटलीबंद व्यावसायिकांचे पाणी जोमात तर अन्न व औषध प्रशासन कोमात गेले असल्याची हल्ली प्रचिती दिसून येत आहे.
उन्हाळ्यात काही विक्रेत्यांकडून बाटलीवर निर्मितीची तारीखही टाकली जात नसल्याचे दिसून येते.काही कंपन्यांचे पाणी मिनरल असते तर काही कंपन्या पॅकेज्ड वॉटरच्या नावाखाली बाटलीबंद पाणी विक्री करीत आहेत.
सर्वांना बाटलीबंद पाण्याची चटक लागल्याचे दिसून येते.अशातच बाटलीबंद पाणी विकत घेणे म्हणजे प्रतिष्ठेचे लक्षण झाले आहे.हॉटेलातील पाणी पिणेही टाळण्यात येत असून बाटलीबंद पाणी खरेदी करण्यात येत आहे.काही व्यावसायिक वापरलेल्या बाटल्यांमध्ये नळाचे पाणी भरून ते थंड करून मिनरल वॉटरच्या नावाखाली विकण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे.सामान्य नागरिक पाणी शुद्धतेच्या मानांकनाबाबत अनभिज्ञ असतात.त्यामुळे त्यांच्याकडून याबाबीकडे दुर्लक्ष होते.नेमका त्याचाच गैरफायदा घेत पाणी विक्रेते ग्राहकांची लूट करीत आहेत.यातूनच पाणी विक्रीचा व्यवसाय आता ग्रामीण भागातही फोफावू लागला आहे.अनेक घरांमध्ये थंड पिण्याच्या पाण्याच्या कॅन जात आहेत.पाण्याची शुद्धताही तपासली जात नाही.केवळ पाणी थंड व स्वस्तात मस्त म्हणून ग्राहक पाणी विकत घेतांना दिसून येतात.याचाच फायदा अनेक व्यावसायिक घेऊन ग्राहकांच्या व सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळले जात आहे.कोणत्याही हॉटेल,पानठेल्यावर आता एक लिटर पाण्याची बाटली किमान १५ ते २० रुपयांना मिळत आहे.अनेक शीतपेय निर्मिती कंपन्याही बाटलीबंद पाण्याची विक्री करीत असून स्थानिक कंपन्याही शुद्ध पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याचा पुरवठा करून गोरखधंदा चालवून व्यवसायात उतरल्या असूनही जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन याकडे अक्षम्य दुर्लक्ष करतांना दिसून येत आहे.
बाटलीबंद पाणी विकण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना आवश्यक असतो.तथापि,परवाना न काढताच काही उद्योजक निर्मिती करतात.याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागही उदासीन दिसत आहे.यातून ग्राहकांच्या आरोग्याला धोका पोहोचण्याची शक्यता आहे.त्यामुळे या विभागाने पाणी विकणाऱ्यांचा परवाना तपासण्याची गरज आहे. त्या पाण्यातील विविध घटकांची तपासणी करणेही आवश्यक आहे.अनेक ठिकाणी केवळ पाणी थंड करून ते विकले जाते.त्यात कोणते घटक आहे. कोणते घटक नाहीत,याबाबत सामान्य ग्राहकांना माहिती नसते.ते पाणी आरोग्यास घातक आहे का? याची तपासणी करणे गरजेचे आहे.मात्र अन्न व औषध प्रशासन विभाग उदासीन असल्याचेच दिसून येत आहे.यासाठी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर न टांगता शुद्ध थंड पाण्याच्या नावाखाली गोरखधंदा चालविणाऱ्यांवर शुद्धता तपासून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी; अशी मागणी सर्वच स्तरातून जोर धरू लागली आहे.