- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-तब्बल सुमारे १७ वर्षांपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील निकाल आज,गुरुवार ३१ जुलै रोजी लागला असून मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएच्या (national investigetion agency)विशेष न्यायालयाने भाजपाच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरसह सातही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.या प्रकरणात ७ मुख्य आरोपींमध्ये भाजपच्या साध्वी प्रज्ञा ठाकूर,कर्नल प्रसाद पुरोहित,रमेश उपाध्याय, अजय राहिरकर,सुधाकर चतुर्वेदी,समीर कुलकर्णी आणि सुधाकर धर द्विवेदी यांचा समावेश होता.
नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव येथे सुमारे १७ वर्षांपूर्वी २९ सप्टेंबर २००८ रोजी रात्री ९.३० वाजता शकील गुड्स ट्रान्सपोर्ट कंपनीसमोरील चौकात बॉम्बस्फोट झाला होता.या स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला होता.यात सय्यद अझहर वय १९ वर्षे,मुश्ताक शेख युसूफ वय २४ वर्षे,शेख रफिक शेख मुस्तफा वय ४२ वर्षे,फरहीन उर्फ शगुप्त शेख लियाकत वय १० वर्षे,
इरफान झियाउल्लाह खान वय २० वर्षे व हारून मोहम्मद शाह वय ७० वर्षे यांचा मृत्यू झाला होता.
याशिवाय १०० हून अधिक लोक जखमी झाले होते.रमजानमध्ये लोक नमाज अदा करण्यासाठी जात असतांना हा स्फोट करण्यात आला होता.त्यामुळेच जखमींची संख्या जास्त होती.हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी,३० सप्टेंबर २००८ रोजी,मालेगावच्या आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.त्यावेळी,३०७,३०२,३२६,३२४,४२७,१५३-अ, १२०ब,स्फोटक कायदा आणि शस्त्रास्त्र कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.सुरुवातीला स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला होता,परंतु नंतर संपूर्ण तपास एटीएसकडे सोपवण्यात आला.एलएमएल फ्रीडम एम एच १५ पी ४५७२ क्रमांकाच्या दुचाकीमध्ये हा स्फोट झाल्याचे उघड झाले.मात्र,वाहनावर सापडलेला नंबर चुकीचा होता.त्याचा चेसिस नंबर आणि इंजिन नंबर देखील मिटवण्यात आला होता.या प्रकरणाची चौकशी करतांना एफएसएल टीमला वाहनाचा योग्य क्रमांक आढळला,ज्यामुळे हे वाहन प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या नावावर असल्याचे उघड झाले.या घटनेच्या सुमारे एक महिन्यानंतर प्रज्ञा ठाकूरसह आणखी २ जणांना अटक करण्यात आली.संपूर्ण प्रकरणात ११ जणांना अटक करण्यात आली,तर साध्वी प्रज्ञा यांना या प्रकरणात मुख्य आरोपी बनवण्यात आले.राष्ट्रीय तपास यंत्रणेने २०१६ मध्ये न्यायालयाला सांगितले की त्यांच्याकडे प्रज्ञा ठाकूरविरुद्ध पुरेसे पुरावे नाहीत.या आधारावर २०१७ मध्ये तिला जामीन मिळाला,जो या खटल्यातील कलमांवर मोठा परिणाम करणारा निर्णय होता.जामिनावर सुटका झाल्यानंतर,प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी २०१९ मध्ये भोपाळमधून भाजप उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि खासदार झाल्या. त्यानंतर,हे प्रकरण केवळ कायदेशीरच नाही तर राजकीय चर्चेचा विषय बनले.अनेकांनी साक्ष फिरवल्या.त्यामुळे न्यायालय योग्य निर्णय देऊ शकले नाही.
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आरोप-स्फोटासाठी एक व्यक्ती पुरवण्याची जबाबदारी घेतली.रामजी कलसांगरा आणि संदीप डांगे यांची सुधाकर धर द्विवेदींशी ओळख करून दिली.
कर्नल (निवृत्त)प्रसाद पुरोहित आरोप-अभिनव भारत संघटना सुरू केली.संस्थेसाठी २१ लाख रुपये उभारले.आरडीएक्स (स्फोटके)ची व्यवस्था केली आणि शस्त्रे खरेदी करण्यास मदत केली.बैठकांना उपस्थित राहून बॉम्ब बनवण्यासाठी तांत्रिक मदत केली.
मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय आरोप-संघटनेचे वरिष्ठ सदस्य.नियोजन बैठकांमध्ये भाग घेतला आणि तांत्रिक आणि वैचारिक मदत केली.
अजय राहिरकर आरोप-तो संघटनेचा खजिनदार होता.तो पैसे गोळा करून इतरांना शस्त्रे खरेदी करण्यासाठी देत असे.त्याच्यावर सुधाकर द्विवेदी आणि राकेश दवादे यांना पैसे दिल्याचा आरोप आहे.
सुधाकर धर द्विवेदी उर्फ शंकराचार्य आरोप-तो बैठकांनाही उपस्थित राहिला.बॉम्ब ठेवणाऱ्या लोकांशी त्याचा संपर्क आला.
समीर कुलकर्णी आरोप-तो संघटनेचा सदस्य होता. तो बैठकांमध्ये उपस्थित असायचा.तो प्रचार करायचा आणि लोकांना जोडायचा.
सुधाकर चतुर्वेदी आरोप-त्याच्या घरात बॉम्ब बनवण्यात आले होते.त्याने स्फोटासाठी दोन लोकांना बॉम्ब देण्याबद्दल बोलले होते.
हे सर्व आरोप न्यायालयात सिद्ध न झाल्याने सातही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
सुमारे १७ वर्षांनंतर दिलेल्या निकालात न्यायाधीश ए. के.लाहोटी म्हणाले की,तपास यंत्रणा आरोप सिद्ध करू शकलेली नाही,त्यामुळे आरोपींना संशयाचा फायदा मिळावा.तसेच स्फोट झाला होता,परंतु मोटारसायकलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता हे सिद्ध झाले नाही.मोटारसायकल साध्वी प्रज्ञा यांच्या नावावर होती हे देखील सिद्ध झाले नाही.कर्नल प्रसाद पुरोहित यांनी बॉम्ब बनवला होता हे देखील सिद्ध झाले नाही व इतर पुरावे सिद्ध न झाल्याने आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.या प्रकरणाचा निर्णय ८ मे २०२५ रोजी देण्यात येणार होता,परंतु त्यानंतर न्यायालयाने तो ३१ जुलैपर्यंत राखीव ठेवला.मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा प्रारंभिक तपास महाराष्ट्र एटीएसने केला होता.२०११ मध्ये हा खटला एनआयएकडे सोपवण्यात आला.एनआयएने २०१६ मध्ये आरोपपत्र दाखल केले.या प्रकरणात ३ तपास संस्था आणि ४ न्यायाधीश बदलले आहेत.
- Advertisement -

