उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- फेब्रुवारी-मार्च मध्ये आयोजित इयत्ता १२ वी व इयत्ता १० वीची परिक्षा लवकरच सुरु होणार आहे.यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.परीक्षेसाठी शिक्षण विभाग पुर्ण क्षमतेने कार्य करीत असून परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावर गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथक भेट देवून गैरप्रकार थांबविणार आहेत.गडचिरोली जिल्ह्यात एकूण ४९ परीक्षा केंद्रे असून इयत्ता १२ वी परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थी संख्या ही १२३४६ आहेत.तर इयत्ता १० वी परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थी संख्या १५०९६ आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळा मार्फत इयत्ता १२ वी ची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२३ ते २१ मार्च २०२३ पर्यंत व इयत्ता १० वी ची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीमध्ये घेण्यात येत आहे.परीक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी “कॉपीमुक्त अभियान” राबविण्यात येणार आहे.शालेय शिक्षण विभागाचे परीपत्रक १४ फेब्रुवारी २०२३ अन्वये जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी जिल्हाधिकारी यांची जिल्हा नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.तर तालुकास्तरावर तहसिलदार यांची तालुका नोडेल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.व जिल्हा समन्वयक म्हणून शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांची नियुक्ती केली आहे.
संभाव्य कॉपीचे प्रमाण असणारे केंद्र व संभाव्य कॉफीचे प्रमाण अधिक असणारे परीक्षा केंद्र –
परीक्षा केंद्रावर या पुर्वी झालेल्या परीक्षेत ५ किंवा त्यापेक्षा जास्त कॉपी केसेस झाल्या आहेत.ते केंद्र संभाव्य कॉफीचे प्रमाण असणारे केंद्र.तर ज्या परीक्षा केंद्रावर बाहेरुन उपद्रव होतो.अशी संभाव्य कॉपीचे प्रमाण अधिक असणारे परीक्षा केंद्र ठरविण्यात आली आहेत.
संभाव्य कॉपीचे प्रमाण असणारे परीक्षा केंद्र – इयत्ता १२ वी मधे ६ आहेत व इयत्ता १० वी मधे १२ आहेत.कॉपीचे प्रमाण अधिक असणारे परीक्षा केंद्र इयत्ता १२ वी मधे १० आहेत. इयत्ता १० वी चे १० आहेत.या परीक्षा केंद्रावर शक्यतेनुसार चित्रीकरण करण्यात येणार आहे.
जनजागृती मोहिम – शिक्षक,मुख्याध्यापक, शैक्षणिक संस्थांचे प्रमुख यांना कार्यशाळा घेऊन माहिती देण्यात आली आहे.जिल्हाधिकारी,पोलीस अधिक्षक,मुख्य कार्यकारी अधिकारी यांची जिल्हा दक्षता समिती नियुक्ती करण्यात आली आहे.परीक्षा दरम्यान ते विविध परीक्षा केंद्रांवर भेटीही देणार आहेत.
पोलीस बंदोबस्त – सर्व परीक्षा केंद्रावर परीक्षा कालावधीसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त देण्यात येत आहे.५० मीटर चे आत अनधिकृत व्यक्तीला प्रवेश नाही.१९७३ च्या कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जिल्हात परीक्षा कालावधी करीता लागु करण्यात येत आहे.परीक्षा केंद्र परिसरातील झेराक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात येतील.
विद्यार्थ्यांची तपासणी –
परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यानी परीक्षा सुरु होण्याच्या प्रत्यक्ष वेळेपुर्वी आर्धा तास अगोदर हजर राहणे अत्यावश्यक असल्याचे शिक्षण विभागाने आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रावर तपासनी केली जाईल. मुलांची पोलीस पाटील, कोतवाल,शाळेतील पुरष कर्मचारी करणार आहेत. तसेच मुलींची तपासणी अंगणवाडी सेविका,मदतनिस व शाळेतील महिला कर्मचारी यांचे कडुन स्वतंत्र कक्षामध्ये केली जाणार आहे.विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर उपस्थित होण्यासाठी मानव विकास कार्यक्रम अंतर्गतच्या बसेसची वेळेत उपलब्ध करुन देण्याबाबत आगार प्रमुख यांना सुचना देण्यात आल्या आहेत.
महसुल विभागाची बैठी पथके व भरारी पथक नेमण्यात आली आहेत.यानुसार प्रशासनाकडून सर्वतोपरी नियोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी परीक्षे दरम्यान निश्चित राहून परीक्षा द्यावी.असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.