उद्रेक न्युज वृत्त
धानोरा(गडचिरोली) :- गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्याच्या विविध भागांतील पिकांमध्ये धुडगूस घालून वनविभागासह शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आणणाऱ्या रानटी हत्तींनी छत्तीसगड राज्याच्या दिशेने पंधरवड्यापूर्वी आगेकूच सुरू केली होती.हे हत्ती छत्तीसगड राज्यात जाणार; असे वाटत होते.परंतु,मुरूमगाव पश्चिम वनपरिक्षेत्रातील कवडीकसा, फुलकोडी आदी जंगल परिसरात हत्तींचा कळप पंधरवड्यापासून स्थिरावला आहे.
कुरखेडा तालुक्यातून रानटी हत्तींचा कळप धानोरा तालुक्यातील मुरूमगाव परिसरात दाखल झाला.त्यानंतर हत्तींच्या कळपाने पश्चिम मुरूमगाव वनपरिक्षेत्रातील जंगल परिसरात ठाण मांडले.या भागात घनदाट जंगल आहे.जंगलात चारा खाऊन कळप सध्या वावरत आहे.हत्तींचा वावर असलेल्या ठिकाणापासून छत्तीसगड राज्याची सीमा ३० ते ३५ किमी अंतरावर आहे.त्यामुळे हत्ती छत्तीसगड राज्यात दाखल होणार की नाही; हे सांगता येत नाही.मात्र, आतापर्यंत हत्तींनी शेतकऱ्यांच्या कोणत्याही पिकाची नासधूस केली नाही; असे मुरूमगाव (पश्चिम)च्या वनपरिक्षेत्र अधिकारी कराडे यांनी सांगितले.
हा भाग मुरूमगाव पूर्व व मुरूमगाव पश्चिम अशा दोन वन परिक्षेत्रांतर्गत येतो.त्यामुळे हत्तींच्या हालचालींवर दोन्ही वन परिक्षेत्राची नजर आहे.विशेष म्हणजे,हुल्ला टीमसह स्थानिक वन कर्मचारीसुद्धा कळपावर ड्रोन कॅमेरांद्वारे पाळत ठेवून आहेत.खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीची कामे जिल्ह्यात सध्या सुरू आहेत.या जंगलाला लागून असलेल्या शेतांमध्ये मशागत करताना रानटी हत्तींपासून धोका होण्याची शक्यता आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.

