- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे शासनाचे होत असलेले दुर्लक्ष आणि कृषी केंद्र चालकांची होणारी कुचंबणा याविरोधात राज्यातील कृषी केंद्र चालक चांगलेच आक्रमक झाले आहेत.यासाठी उद्या,सोमवार २७ एप्रिलपासून राज्यातील सर्व कृषी केंद्रे बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय कृषी केंद्र चालकांच्या संघटनेने घेतला आहे.आमच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही,असा रोखठोक पवित्रा संघटनेने घेतला आहे. महाराष्ट्र फर्टीलायझर्स, पेस्टीसाईड्स आणि सीड्स डिलर्स असोसिएशनने कृषी विभागाला दिलेल्या निवेदनात गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याची खंत व्यक्त केली आहे.विक्रेत्यांच्या संघटनेने कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण)यांना सादर केलेल्या निवेदनात बियाणे, रासायनिक खते आणि किटकनाशके विक्री व्यवसायातील अनेक गंभीर अडचणींचा उल्लेख केला आहे.खतांच्या पुरवठ्यातील ‘लिंकींग’ पद्धत बंद करण्याची मागणी करण्यात आली असून,शेजारील राज्यांतून येणाऱ्या अप्रमाणित एचटीबीटी कपाशी बियाण्यांवर तातडीने बंदी घालावी.याशिवाय ‘साथी’ पोर्टलचा वापर विक्रेत्यांवर सक्तीने न लादता तो उत्पादक व पुरवठादार कंपन्यांपर्यंत मर्यादित ठेवावा, अशी मागणी पुढे आली आहे.बियाणे सॅम्पल फेल झाल्यास केंद्र चालकांवर कोर्ट केसेस करण्याऐवजी त्याची पूर्ण जबाबदारी उत्पादक कंपन्यांवर निश्चित करावी आणि केंद्र चालकांना केवळ साक्षीदार म्हणून ग्राह्य धरावे. तांत्रिकदृष्ट्या क्लिष्ट असलेले ‘साथी’ ॲप दुकानदारांवर लादणे थांबवून प्रशासनाने थेट कंपन्यांच्या गोदामातूनच सॅम्पल तपासणी करावी.खत कंपन्यांकडून होणारी बेकायदेशीर लिंकिंग विक्री,युरिया व डीएपी विक्रीसाठी सात-बारा पाहण्याची जाचक अट आणि मुदतबाह्य कीटकनाशके परत न घेणाऱ्या कंपन्यांची मनमानी यावरही निवेदनातून ताशेरे ओढले आहेत.अवैध बियाणे विक्रीवर कारवाई करण्याऐवजी केवळ अधिकृत दुकानदारांना किरकोळ त्रुटींसाठी त्रास दिला जात असल्याचा आरोपही कृषी केंद्र चालकांनी केला आहे.
- Advertisement -

