- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-आर्थिक साक्षरतेबरोबरच सामाजिक सुरक्षा योजनांबाबत प्रभावी जनजागृती केल्यास नागरिकांना संकटाच्या काळात मोठा आर्थिक आधार मिळू शकतो,याचा प्रत्यय गडचिरोली तालुक्यात आला आहे.प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY)अंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या लाभार्थ्याच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला २ लाख रुपयांची विमा मदत प्रदान करण्यात आली.
असेस डेव्हलोपमेंट सर्व्हिसेस,नवी दिल्ली यांच्या माध्यमातून मागील दोन वर्षांपासून RBI–Money Wise वित्तीय साक्षरता केंद्र गडचिरोली तालुक्यात कार्यरत असून,तालुक्यातील सुमारे ५० टक्के गावांमध्ये आर्थिक साक्षरतेचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.या उपक्रमांतर्गत नागरिकांना घरगुती अर्थसंकल्प,बचतीचे महत्त्व,बँकिंग सेवा,आर्थिक नियोजन,विविध विमा योजना तसेच सामाजिक सुरक्षा योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात येते.याशिवाय प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना(PMJJBY), प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY),अटल पेन्शन योजना(APY)तसेच नवीन बचत खाते उघडण्याबाबत संबंधित बँकांच्या सहकार्याने गावागावांत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येते.
याच उपक्रमांतर्गत १५ सप्टेंबर २०२५ रोजी गडचिरोली तालुक्यातील राखी येथे Money Wise वित्तीय साक्षरता केंद्र व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM)यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक साक्षरता शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात आयसीआरपी (ICRP)योगिता कोठारी,कृषी सखी पल्लवी बोदलकर तसेच उदय काकपुरे यांच्या सहकार्याने नागरिकांना विविध आर्थिक व सामाजिक सुरक्षा योजनांची माहिती देण्यात आली.यावेळी पुरुषोत्तम दयाराम बोदलकर यांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण स्वीकारले होते.
दुर्दैवाने ९ नोव्हेंबर २०२५ रोजी पुरुषोत्तम बोदलकर यांचे आकस्मिक निधन झाले.त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून विमा दावा सादर करण्यात आला.दावा मंजूर झाल्यानंतर त्यांच्या पत्नी वर्षा पुरुषोत्तम बोदलकर यांना २ लाख रुपयांच्या विमा दाव्याचा धनादेश प्रदान करण्यात आला.
बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक अंशुल कुमार आर्या तसेच जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक(Lead District Manager)प्रशांत धोंगळे यांच्या हस्ते लाभार्थी कुटुंबाला धनादेश सुपूर्द करण्यात आला. सदर विमा नोंदणी प्रक्रिया Money Wise वित्तीय साक्षरता केंद्राचे प्रतिनिधी अंकित चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली होती.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना,प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजनेसारख्या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.अल्प वार्षिक प्रीमियममध्ये उपलब्ध असलेल्या या योजनांमुळे आकस्मिक परिस्थितीत कुटुंबाला महत्त्वाचा आर्थिक आधार मिळतो. त्यामुळे प्रत्येक पात्र नागरिकाने संबंधित बँक, वित्तीय साक्षरता केंद्र अथवा ग्रामस्तरावरील शासकीय यंत्रणेशी संपर्क साधून या योजनांमध्ये सहभागी व्हावे,असे आवाहन त्यांनी केले आहे.
- Advertisement -

